देशातील गुन्हेगारीची बिहार राजधानी   

राहुल गांधींची टीका 

पाटणा : एकेकाळी शांतता आणि न्यायाची भूमी समजला जाणारा बिहार आता भारताची गुन्हेगारी राजधानी बनला आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.नालंदाच्या राजगीर येथे ’संविधान सुरक्षा संमेलन’ला राहुल यांनी संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, मी संविधान वाचवण्यासाठी आणि देशाच्या सर्वांगीण कल्याणासाठी जातीय जनगणनेसाठी लढत आहे. भविष्यात आम्ही जिथेही सरकार बनवू, तिथे आम्ही आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा काढून टाकू. त्याची सुरुवात बिहारपासून होईल. 
   
मोदी सरकार कधीही खर्‍या अर्थाने जातीय जनगणना करणार नाही. कारण ज्या दिवशी ते खर्‍या अर्थाने जातीय जनगणना करतील, त्या दिवशी त्यांचे राजकारण संपेल. जातीय जनगणनेचे दोन मॉडेल आहेत. एक भाजप मॉडेल आणि दुसरे तेलंगणा मॉडेल. भाजप मॉडेलमध्ये अधिकारी बंद खोलीत प्रश्नांवर निर्णय घेतील. निवडक अधिकार्‍यांच्या गटात ओबीसी, दलित किंवा आदिवासी समुदायातील कोणताही अधिकारी नाही. ओबीसी, दलित किंवा आदिवासी समुदायातील कोणत्याही अधिकार्‍यांशिवाय केंद्र जातीय जनगणना योग्यरित्या करू शकेल का, अशी शंका आहे.
   
बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून नितीश कुमार सरकारवर टीका करताना ते म्हणाले, बिहार एकेकाळी शांतता आणि न्यायाची भूमी होते. आता ते ’भारताची गुन्हेगारीची राजधानी’ बनली आहे.पंतप्रधान  मोदींवर टीका करताना  ते म्हणाले, जेव्हा भारत-पाकिस्तानमध्ये लष्करी तणाव होता, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदींनी लगेच शरणागती का पत्करली. या मुद्द्यावर त्यांनी मौन सोडावे.   
 

Related Articles