जुन्नर तहसील कार्यालयात खासगी दलालांचा सुळसुळाट   

शासकीय दाखल्यांसाठी नागरिकांची पिळवणूक

बेल्हे, (वार्ताहर) : जुन्नर तहसीलदार कार्यालयात खासगी दलालांचा सुळसुळाट झाला असून, सरकारी दाखल्यांची कामे दलालांशिवाय होत नसल्याने नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे.जुन्नर तहसील कार्यालयात सध्या विविध दाखल्यांसाठी पालक व विद्यार्थ्यांची गर्दी आहे. विविध महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले उत्पन्न दाखले, नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
 
सरकारने आपले सरकार ई-सर्टिफिकेटर पोर्टलवरून दाखले ऑनलाईन उपलब्ध करून दिल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात दाखल्यांसाठी अर्ज केल्यानंतर आठवड्यांनंतरही कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून शुल्क भरल्यानंतरही यंत्रणा कार्यक्षमतेने काम करत नसल्यामुळे पालकांचे हाल होत आहेत.
 
दरम्यान, तलाठ्यांकडून मिळणारा चौकशी अहवाल व महसूल कार्यालयातून होणार्‍या संथ हालचालींमुळे दाखले मिळण्यास १५ दिवसांपेक्षा अधिक वेळ लागत आहे. परिणामी एजंटमार्फत काम करण्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, हे एजंट हजारो रुपयांची लूट करत असून, सरकारच्या यंत्रणेवर अविश्वासाची छाया पडत आहे. कार्यालयातील कर्मचारी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा कार्यालयात दाखल होत असल्याची तक्रार वारंवार नागरिकांनी केली आहे. सरकारी वेळेनुसार सकाळी ९.४५ पासून कार्यालय सुरू असावे लागते, मात्र बहुतांश कर्मचारी साडेदहा किंवा त्यानंतरच हजेरी लावतात, असे बोलले जात आहे.

दाखले न मिळाल्याचा विद्यार्थ्यांना फटका

दहावी व बारावीच्या निकालानंतर दाखल्यांची गरज वाढते, परंतु वेळेवर दाखले न मिळाल्यास विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या शैक्षणिक संधीपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे शासनाने तरी शिक्षणासाठी लागणार्‍या दाखल्यांसाठी वेगळी जलद कार्यपद्धती सुरू करावी,अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. याशिवाय, तलाठी स्तरावरच उत्पन्न दाखले दिले जावेत किंवा मंडळ अधिकारी (सर्कल) यांच्या माध्यमातून प्रक्रिया सोपी करावी, अशीही मागणी होत आहे. अन्यथा यंत्रणेत बदल होईपर्यंत अशा पिळवणुकीस बळी पडावे लागणार, असा सूर सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे.

Related Articles