फिरकीपटू पीयूष चावला निवृत्त   

मुंबई : भारताचा  फिरकीपटू पीयूष चावला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त झाला. इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याने निवृत्तीची घोषणा केली. पीयूषने त्याच्या पोस्टमध्ये टीम इंडिया आणि आयपीएल जर्सीमधील अनेक फोटो देखील शेअर केले आहेत. पियूष चावला भारताच्या दोन विश्वचषक विजेत्या संघांचा भाग होता. २०१२ मध्ये वानखेडे स्टेडियमवर त्याने भारताकडून शेवटचा सामना खेळला.  निवृत्तीची घोषणा करताना पियूषाने इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट लिहिली. दोन दशकांहून अधिक काळ मैदानावर घालवल्यानंतर आता आता या सुंदर खेळाला निरोप देण्याची वेळ आली आहे. सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून ते २००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणार्‍या संघाचा भाग होण्यापर्यंतच्या आठवणी माझ्या हृदयात नेहमीच राहतील. माझ्यावर विश्वास ठेवणार्‍या आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्ज, कोलकाना नाइट रायडर्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे मनापासून आभार.
 
पुढे त्याने म्हटले आहे की, मी माझे प्रशिक्षक  के. के. गौतम आणि दिवंगत पंकज सारस्वत यांचा मनापासून आभारी आहे, ज्यांनी मला घडवले आणि एक क्रिकेटपटू म्हणून ओळख मिळवून दिली. या प्रवासात आणि सर्व चढ उतारांमध्ये माझे कुटुंब नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. मी माझ्या वडिलांचा नेहमीच ऋणी राहील. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांच्याशिवाय हा प्रवास कधीच शक्य झाला नसता. मी बीसीसीआय, यूपीसीए  आणि जीसीए यांचेही आभार मानतो, ज्यांनी मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. आज माझ्यासाठी खूप भावनिक दिवस आहे. कारण मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे. मी क्रिकेटपासून दूर गेलो तरी क्रिकेट नेहमीच माझ्या हृदयात राहील. या सुंदर खेळाचे धडे घेऊन  नव्या प्रवासाला सुरुवात करण्यास उत्सुक आहे.

Related Articles