कर्नाटक सरकारला न्यायालयाची नोटीस   

बंगळुरु चेंगराचेंगरी ; सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश

बंगळुरु : चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी नोटीस बजावली. तसेच, चेंगराचेंगरीप्रकरणी न्यायालयासमोर सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणी १० जून रोजी होणार आहे.
 
या प्रकरणाची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. मुख्य न्यायाधीश व्ही. कामेश्वर राव आणि न्यायमूर्ती सी.एम. जोशी यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर याबाबतची काल सुनावणी पार पडली.आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बगळुरूचा (आरसीबी) बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयोत्सव होता. या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी आणि खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. यातूनच मोठा गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ११ जणांना प्राण गमवावे लागले. तर, ५० हून अधिक जण जखमी झाले.
 
स्टेडियममध्ये मोफत प्रवेश मिळणार, असा चाहत्यांचा समज झाला आणि त्यांनी प्रवेशद्वारांवर मोठी गर्दी केली. यातूनच चेंगराचेंगरी झाली, असे महाधिवक्ता शशी किरण शेट्टी यांनी न्यायालयात सांगितले. नेमकी चूक कुठे आणि कशी झाली हे आम्ही जाणून घेत आहोत. भविष्यात पुन्हा अशी दुर्घटना होणार नाही, यादृष्टीने सरकार पावले उचलत आहे, असे पीठासमोर सांगितले.
 
पोलिस आणि सुरक्षा कर्मचार्‍यांच्या तैनातीचा संदर्भ देताना ते म्हणाले, स्टेडियमची क्षमता ३० हजारांची होती. मात्र, प्रत्यक्षात क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे अडीच लाखांहून अधिक चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.या प्रकरणाची दंडाधिकार्‍यांमार्फत चौकशी सुरु झाली आहे. ती १५ दिवसांत पूर्ण होईल, असे स्पष्ट करताना या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे, असेही त्यांनी खंडपीठासमोर सांगितले. आयोजकांसह संबंधित घटकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेस जबाबदार असणार्‍यांना कारवाई केली जाईल, असेही सांगितले.
 
सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना सरकारने जारी करायला पाहिजे. कार्यक्रम स्थळी रुग्णवाहिका उपलब्ध हवी.तसेच, जवळच्या रुग्णालयांची पुरेशी माहिती आयोजकांना हवी, असे निरीक्षण खंडपीठाने यावेळी नोंदविले.
 

Related Articles