गुंजवणीचे पाणी पुन्हा वादात   

वाल्हे,(वार्ताहर) : पुरंदर तालुक्यासाठी लाभदायी ठरणार्‍या गुंजवणी प्रकल्पाचे काम लाभार्थी वर्गाला देखील संभ्रमात टाकणार असल्याने गुंजवणीचे पाणी पुन्हा राजकीय वादाच्या भोवर्‍यात सापडणार का ? असाच सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
 
काही दिवसांपूर्वी गुंजवणी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पाहणी करणार्‍या अधिकार्‍यांनी लाभार्थी वर्गाला विश्वासात न घेता मर्जीप्रमाणे प्रकल्पाचे काम सुरु केल्याची चर्चा होती. त्यामुळे २५ मे रोजी वाल्हे सह परिसरातील शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत गुंजवणी प्रकल्पाचे चुकीचे काम बंद पाडून १९९३च्या सर्व्हेनुसारच काम सुरु करण्याची मागणी देखील केली होती.
 
परंतु गुंजवणी प्रकल्प हा महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने एका विशिष्ठ गटाने वाल्हे पोलीस चौकीसह एल. एन. टी. कंपनीच्या व्यवस्थापकांना निवेदन देवून पुन्हा गुंजवणी प्रकल्पाचे काम सुरु केले होते. मात्र चुकीच्या मार्गाने प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु झाल्याने वाल्हे सह परिसरातील शेतकर्‍यांनी एकजूट दाखवत हरणीच्या घाटाजवळील गुंजवणी प्रकल्पाचे काम दुसर्‍यांदा बंद पाडले आहे. 
 
यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी राजकीय दादागिरीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच १९९३च्या सर्व्हे नुसार प्रकल्पाचे काम सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.
 
या प्रसंगी अ‍ॅड. फत्तेसिंग पवार, बाळासाहेब राऊत, आझाद पवार, उमेश पवार, अतिश जगताप, माणिक महाराज पवार, रणसिंग पवार,काँग्रसचे ज्येेष्ठ नेते बाळासाहेब भुजबळ, बंटी बर्गे, मदन भुजबळ, शांताराम पवार, सुनील पवार, सतीश पवार, रमजान आतार, राजसिह पवार, कांतीलाल भुजबळ, संतोष गरुड यांसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
 

Related Articles