कटरा-श्रीनगर वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून होणार सुरू   

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील कटरा ते श्रीनगर दरम्यान वंदे भारत रेल्वे सेवा उद्यापासून (शनिवार) सुरू होणार आहे. उत्तर रेल्वेने गुरुवारी ही घोषणा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.त्यानंतर प्रवाशांना आयआरसीटीसी पोर्टलवर या गाड्यांसाठी तिकिटे बुक करण्याचा पर्याय मिळाला आहे. कटरा आणि श्रीनगर दरम्यान दररोज दोन वंदे भारत गाड्या चार फेर्‍या करतील. या रेल्वेमध्ये दोन वर्ग आहेत. चेअर कार (सीसी) आणि एक्झिक्युटिव्ह क्लास (ईसी) आणि तिकिटाची किंमत अनुक्रमे ७१५ रुपये आणि १ हजार ३२० रुपये आहे. 
 
पहिली रेल्वे कटरा येथून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि श्रीनगरला सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी पोहोचेल. हीच रेल्वे श्रीनगरहून दुपारी २ वाजता परत येईल आणि कटरा येथे ४ वाजून ५८ मिनिटांनी पोहोचेल. मंगळवारी ही रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाही.
 
त्याचप्रमाणे, दुसरी रेल्वे कटरा येथून दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि श्रीनगरला सायंकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी पोहोचेल. तीच रेल्वे दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजता श्रीनगरहून परत येईल. ही सेवा बुधवारी सुरू राहणार नाही. तीन तासांच्या प्रवासादरम्यान या गाड्या सध्या केवळ बनिहाल येथे थांबतील.
 

Related Articles