संजय राऊत असताना उद्धव यांना शत्रूची गरजच नाही   

गिरीश महाजन यांचा पलटवार

मुंबई,  (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांच्यापेक्षा मोठा कोणी दलाल नाही. त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला शरद पवार यांच्या मांडीवर नेऊन बसविले. काँग्रेसच्या दावणीला बांधले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार संपविले. संजय राऊत यांच्या बडबडीला कंटाळून आता शिवसेनेत राहायला कोणी तयार नाही. राऊत असताना उद्धव यांना कोणा शत्रूची गरजच नाही. उद्धवजी देव तुमचे भले करो, असा पलटवार महाजन यांनी केला.
 
राऊत यांनी महाजन यांची दलाल या शब्दांत संभावना केली होती. सत्ता बदलली तर महाजनच पहिले पक्ष सोडतील, असे राऊत म्हणाले होते. त्याबाबत महाजन म्हणाले, मी पस्तीस वर्षे सात टर्मचा आमदार आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे. वीस वर्षे विरोधात बसलो तेव्हा मला देखील पक्ष सोडण्याची आमिषे होती. पण, तेव्हा पक्ष सोडला नाही. आता तर पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही. आम्ही विचारांचे पाईक आहोत. उलट, राऊत यांनीच पक्ष संपवला आहे. राऊत यांनीच शिवसेनेला पवारांच्या, काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसविले त्यात जेवढी दलाली केली तेवढी कोणी केली नसेल. हेच राऊत पत्राचाळ प्रकरणात कारागृहात गेले होते. ते मला बोलायला लावू नका, असे महाजन म्हणाले.

देवच उद्धव यांचे भले करो 

राऊत यांची बडबड अशीच सुरू राहिली तर उद्धव ठाकरे यांची उरलेली शिवसेना पण संपून जाईल. आताच अनेक लोक सोडत आहेत. सोडणार आहेत. देवच उद्धव यांचे भले करो, असा टोलाही महाजन यांनी लगावला.
 

Related Articles