अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांना दोन हेक्टरपर्यंतच मदत   

शिंदे सरकारचा आणखी एक निर्णय फडणवीसांनी बदलला!

मुंबई, (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीपूर्वी उदार झालेल्या महायुती सरकारने पुन्हा सत्तेवर आल्यानंतर पूर्वीचे निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बाधित शेतकर्‍यांच्या मदतीबाबतही सरकारने आधीचा निर्णय बदलून हात आखडता घेतला आहे. बाधित शेतकर्‍यांना आता २७ मार्च २०२३ च्या जुन्या निकषानुसार तीन हेक्टर ऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील भार कमी होणार आहे.
 
गेल्यावर्षी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर महायुती सरकारने नोव्हेंबर २०२३ मध्ये पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील बाधित शेतकर्‍यांना खूष करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात १ जानेवारी २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात जमिनीची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टर केली होती. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर १३,६०० रुपये,  बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर २७,००० रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ३६,००० रुपये देण्याचा निर्णयही तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने घेतला होता. पण निवडणुकीनंतर बदललेल्या अनेक निर्णयांप्रमाणे हा ही निर्णय बदलला आहे.

Related Articles