मणिपूरमध्ये पावसाने ८८३ घरांचे नुकसान   

इम्फाळ : मणिपूरमध्ये गेल्या ४८ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ८८३ घरांचे पूर आणि दरड कोसळल्यामुळे नुकसान झाले असून, ३ हजार ८०२ नागरिक प्रभावित झाले आहेत.मुसळधार पावसाने नद्यांना पूर आले असून, बंधारे फुटल्यामुळे इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी इम्फाळ पूर्वेतील पूरग्रस्त भागातून जवळपास आठशे नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. शनिवारी संध्याकाळपर्यंत एकूण ३ हजार २७५ गावांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. यामध्ये दोन नागरिक जखमी झाले असून, ६४ जनावरे मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे. 
 
आतापर्यंत राज्यात दरड कोसळल्याच्या १२ घटना घडल्या आहेत. चेकाँग परिसरात इम्फाळ नदी दुथडी भरून वाहू लागल्याने ऑल इंडिया रेडिओच्या इम्फाळ कॅम्पस आणि जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेससह अनेक कार्यालये आणि आस्थापनांचे परिसर पाण्याखाली गेले आहेत. रविवारी सकाळी चेखोन आणि वांगखेई येथील पाण्याची पातळी कमी झाली, परंतु खुराई आणि हिंगांग मतदारसंघातील परिस्थिती तशीच आहे.
 

Related Articles