तहान लागली म्हणून कोणी गढूळ पाणी पीत नाही   

सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना राऊत यांचा टोला

मुंबई, (प्रतिनिधी) : शरद पवार कोणत्याही स्थितीत भाजपसोबत जाणार नाहीत. पण, सुप्रिया सुळे यांचे नाव तुम्ही वारंवार घेता. त्यांना सत्तेची तहान नक्कीच लागली आहे. पण, तहान लागल्यानंतर कोणी गटारातील गढूळ पाणी पीत नाही, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी लगावला.
 
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार, राष्ट्रवादीचा शरद पवार गटही भाजपसोबत जाणार, अशी कुजबूज सुरू आहे. पवार गटातील काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटातील नवी पिढी भाजपसोबत जाण्यास व्याकूळ झाली असून, असा निर्णय घेईल काय? असा प्रश्न पत्रकारांनी राऊत यांना पत्रकार परिषदेत केला. तेव्हा राऊत यांनी, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण, शरद पवार हे भाजपबरोबर जाणार नाहीत. पवार यांनी राजकारणामध्ये खूप मोठी ‘इनिंग’ खेळली आहे. आता ते प्रत्यक्ष मैदानात नसले तरी कोचिंगच्या भूमिकेत आहेत. पवार यांची विचारधारा, आतापर्यंतच्या भूमिका पाहिल्यावर ते भाजप किंवा अशा विचारांच्या लोकांबरोबर कधीच जाणार नाहीत हा विश्वास मला आहे, असे सांगितले. मात्र, त्यांची नवीन पिढी काय निर्णय घेते माहिती नाही, असेही स्पष्ट केले. 
 
शरद पवार हे भाजपसोबत जाणार नाहीत, पण त्यांच्या पक्षातील काही नेत्यांचे कारखाने, सूत गिरण्या असल्याने त्यांना सत्तेची नक्कीच तहान लागली असेल. पण, तहान लागल्यावर कोणी गटारातील किंवा गढूळ पाणी पीत नाही, असे राऊत म्हणाले.

जमवलेली संपत्ती सांभाळण्यासाठी धडपड 

बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले किंवा उद्धव ठाकरे यांनी ज्यांना उभे केले त्यातील अनेक लोक पळून गेले. ते कुणाच्या हातात नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, गणेश नाईक हे मूळचे शिवसेनेचे आहेत. पण, आता सध्याच्या राजकारणामध्ये कुणी कुणाच्या हातात राहत नाही. राजकारण स्वार्थी आणि मतलबी झाले आहे. लोकांना तात्कालिक फायदे हवे आहेत, त्यासाठी लोक जातात. लोकांना आपली प्रॉपर्टी, संपत्ती वाचवायची आहे. सरकारच्या तपास यंत्रणाच्या दबावामुळे भयभीत होऊन लोक जातात, असेही राऊत म्हणाले.
 

Related Articles