दहशतवादी हल्ल्यांना घाबरत नाही   

उमर यांनी पहलगाममध्ये मंत्रिमंडळ बैठकीतून दिला संदेश

पहलगाम : जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी पहलगाममध्ये मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेतली. या बैठकीद्वारे भ्याड दहशतवादी हल्ल्यांना घाबरत नाही, असा संदेश देण्यात आला.
 
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. नाव आणि धर्म विचारुन दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यामध्ये २६ जणांना प्राण गमवावे लागले होते. यामध्ये दोन स्थानिकांचा समावेश होता. तर, अन्य २४ जण विविध राज्यांतून पर्यटनासाठी आले होते. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ स्थळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर, तीन दिवस भारत आणि पाकिस्तानात लष्करी संघर्ष झाला होता. अखेर पाकिस्तानला नमते घ्यावे लागले होते. 
 
पहलगाम हल्ल्यानंतर काल उमर यांनी पहिलीच मंत्रिमंडळ बैठक घेतली. या बैठकीचे छायाचित्र मुख्यमंत्री कार्यालयाने समाज माध्यमावर प्रसिद्ध केले आहे. ही केवळ बैठक नव्हती, तर भ्याड दहशतवादी हल्ल्यांना सरकार घाबरत नाही, हा संदेश होता, असे उमर यांनी म्हटले आहे. शांततेचे शत्रू कधीही आमच्या निर्धारावर हुकूम गाजवू शकणार नाहीत. जम्मू-काश्मीर खंबीर, मजबूत आणि निर्भय आहे, असेही उमर यांनी म्हटले आहे.
 
जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचारास तसेच देशविरोधी आणि समाजविरोधी घटकांना  स्थान नाही, असेही ते म्हणाले.२००९ ते १४ या काळात जेव्हा अब्दुल्ला यांचे सरकार होते, त्यावेळीही त्यांनी उत्तर काश्मीरमधील गुरेझ, माचिल, तंगधार आणि जम्मू प्रदेशातील राजौरी आणि पूंछ यांसारख्या दुर्गम भागात मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्या होत्या. 

Related Articles