वाचक लिहितात   

बेजबाबदार वृत्तवाहिन्या
 
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईचे आपल्याकडील काही उथळ आणि बेजबाबदार इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांकडून बटबटीत प्रसारण केले गेले. इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांवर जे काही प्रसारित केले जाते, ते शून्यवृत्तमूल्य आणि म्हणूनच केराच्या टोपलीत टाकायच्या लायकीचे असते; परंतु जनतेला ’युद्धस्य कथा रम्या :! या न्यायाने सध्या युद्धाच्या नावाखाली या वृत्तवाहिन्यांकडून जो काही उच्छाद मांडला आहे, तो न केवळ उबग आणणारा तर एकप्रकारे लोकद्रोहच ठरतो. खोटे फोटो, खोटे व्हिडिओ प्रसारित करून जनतेचा बुद्धीभेद करून देशात युद्धज्वर पसरवला जात आहे. कथित ’सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार’ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर भारतीय लष्कराचा कब्जा, बलुचिस्तानदेखील स्वतंत्र झाला अशा आशयाच्या बातम्या देण्यापर्यंत या उथळ, बेजबाबदार होत्या. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यापासून आपल्या सैन्यदलाने आणि सरकारने जे काही निर्धाराने आणि संयमाचे दर्शन घडवले, त्यावर पाणी फेरण्याचे काम या वृत्तवाहिन्या आणि वृत्तनिवेदक करत आहेत. कथित वृत्तवाहिन्यांनी आपल्या फेकन्यूजच्या माध्यमातून ’टीआरपी’चा जो काही धंदा सुरू केला आहे तो अतिशय गंभीर आहे.
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे 
 
अनधिकृत स्कूलबसेसमधून वाहतूक 
 
राज्यात शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या ४० हजार बसेस रस्त्यांवर धावत असल्या तरीही इतर सुमारे ५० ते ६० हजार स्कूल बसेस अनधिकृतरित्या आणि धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची ने-आण करीत असल्याची तक्रार स्कूल बसचालक मालक संघटनेचे प्रतिनिधी आणि पालक असोसिएशनच्या बैठकीत उघड झाले. अनधिकृतरित्या चालविल्या जाणार्‍या स्कूल बसेसना येत्या तीन महिन्यांच्या काळात दंडात्मक रक्कम भरून त्या अधिकृत करून घेण्याची संधी राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी दिली आहे. शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखावह होण्यासाठी स्कूल बसेसच्या नियमांत सुधारणा केल्या जातील, तसेच पालकांच्या सूचनांचा, भावनांचा आणि अडचणींचा विचार केला जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल असे सांगितले आहे; मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत आजवर राज्यात ज्या अनधिकृत स्कूल बसेस चालविण्यात येत होत्या. त्याबद्दल काहीही स्पष्ट खुलासा केला गेला नाही. पालकांनी देखील या प्रकरणी खुलासे किंवा चौकशी करण्याचे मुद्दे उपस्थित केले नाहीत, याचेच आश्‍चर्य वाटते. 
 
स्नेहा राज, गोरेगांव.
 
पर्यटनावर बहिष्कार घाला
 
सोशल मीडियावर मिळालेल्या लेखाच्या आधारे २०२४ मध्ये २.७५ लाख भारतीयांनी पर्यटनासाठी तुर्कस्तानला आणि २.५ लाख भारतीयांनी अझरबैजानमधील बाकूला प्रवास केला. भारतीय पर्यटकांच्या आगमनामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडला. भारतीय पर्यटकांची अझरबैजानमधील सरासरी राहण्याचा कालावधी ४-६ दिवस असून तुर्कस्तानमध्ये तो ७-१० दिवस आहे. भारतीय पर्यटक अझरबैजानमध्ये दरवर्षी <१,०००-<१,२५० कोटी आणि तुर्कस्तानमध्ये <२,९००-<३,३५० कोटी इतके योगदान देतात. सोशल मीडिया आणि चित्रपटांमुळे तुर्कस्तान व अझरबैजानकडे ओढ वाढली आहे. यामुळे अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले; परंतु ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कस्तान व अझरबैजान यांनी भारतविरोधात पाकिस्तानला समर्थन दिले आहे. त्यामुळे पुढील वेळी पर्यटनाची योजना करताना हे दोन देश वगळावेत. भारतात व जगात इतर अनेक सुंदर ठिकाणे आहेत.
आल्हाद माळगावकर, पनवेल
 
तारतम्य व संयम हवाच
 
केसरी (दि.१० मे) मधील पाकिस्तानची खुमखुमी या संपादकीयातून पाकिस्तानच्या नागरी भागाला हानी न पोहोचवता केवळ दहशतवाद्यांचे तळ जमीनदोस्त करण्याची कारवाई करून, तसेच हवेतल्या हवेत ड्रोन, विमानांचा वेध घेणार्‍या भारताने सीमारेषा, समुद्रीतट यांवर केवळ पाकिस्तानी हल्ले थोपवण्याची कारवाई करून संघर्ष बंदीचे तारतम्य अन् संयम बाळगला, यावर अभिमानाने वक्तव्य केले आहे. पाकिस्तानसारखा नागरी विमानांच्या आडून पुन्हा भ्याड हल्ला करण्याचा आततायीपणा भारत करत नाही हे महत्वाचे. पाकिस्तानचा कांगावा, बढाया त्यांच्या प्रसारमाध्यमांद्वारे जगजाहीर आहेत. त्यामुळे तेथील लष्करी अधिकार्‍यांसह सत्ताधारीही तोंडघशी पडणारच; पण याचवेळी आपल्याकडील प्रसारमाध्यमे, वृत्तवाहिन्यांची ’दूर’दृष्टी एवढी तीक्ष्ण झाली की, त्यांनी पाकिस्तानचे लाहोर, कराचीसारखे शहरी प्रांतही बातम्यांमधून बेचिराख करून टाकले! खरे तर आपल्या सैन्याचा संयम व निशाण्यांचा नेमकेपणा जनतेसमोर ठेऊन अभिमान व्यक्त करावा हे पथ्य, जे केसरीसारख्या वृत्तपत्रांनी बर्‍यापैकी पाळली, तो जबाबदारपणा, तथाकथित ’टीआरपी’ वाढवण्याचा सोस बाळगणार्‍या दृकश्राव्य माध्यमांच्या वृत्तवाहिन्यांनी दाखवणे हेच या घडीचे कर्तव्य आहे.
 
श्रीपाद कुलकर्णी, पुणे
 
भारताच्या युद्धसज्जतेचे यश
 
पाकिस्तानने दाखविलेली अमानवी आणि हिंसक प्रवृत्ती दहशतवादाला पोषक होती हे भारताने उघड करून दाखवले. त्याकरिता प्रत्यक्ष युद्ध न करता केवळ एअर स्ट्राईक्स आणि सर्जिकल स्ट्राईक्स करून आपल्या जवानांचे प्राण वाचविताना शत्रुराष्ट्रातील मानवी आणि जीवितहानी होणार नाही, याची काळजी घेत राबविलेली ऑपरेशन सिंदूर मोहीम आखून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात यश मिळवले. पाकिस्तानकडून घातक आणि मानवी जीवनमूल्यांना विचारात न घेता जम्मू विद्यापीठावर केलेला क्षेपणास्त्र हल्ला आणि सीमेपलीकडून भारतीय हद्दीत हल्ले करून निष्पाप भारतीय नागरिकांचे बळी घेतले. यामुळेच पाकिस्तानचे हल्ले अमानवी आणि हिंसक प्रवृत्ती दहशतवादाला पोषक होते हे जगाने ओळखले.
 
आर्थिक ताणतणाव असल्यामुळे भारताशी संघर्ष करणे परवडणारे नाही, हे समजून आल्यानंतरही परदेशांकडून आर्थिक मदत मिळवून ती दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत भारतात निरपराधांचे बळी घेण्यास वापरणार्‍या पाकिस्तानी सत्ताधार्‍यांची बौद्धिक दिवाळखोरी जगासमोर आली. ना मजबूत आर्थिक स्थिती, सैन्यदल आपल्या देशातील नागरिकांच्या संरक्षणासाठी किती उपयुक्त ठरू शकते याची खात्री नाही. देशात सामाजिक, राजकीय स्थिरता नाही, लोकांच्या गरजा भागविण्याचे प्रयत्न केले जात नाहीत, अशाने त्या देशातील नागरिक सत्ताधार्‍यांची किती काळ साथ देतील याबद्दल साशंकता आहे. त्यात भर म्हणून त्यांनीच पाळलेल्या दहशतवाद्यांनी भारतावर हल्ले करताच स्वदेशाची सुरक्षा वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला, तोच खर्च देशातील नागरिकांच्या भल्यासाठी केला असता, तर नागरिक नक्कीच सुखावले असते आणि ते सत्ताधार्‍यांच्या पाठीशी उभे राहिले असते. परिणामी देशातील नागरिकच नव्हेत, तर चीन, तुर्कस्तान आणि एखाद दुसरा देश वगळता कुठलाही देश पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला नाही. सौदी अरेबिया, यूएई, कतार या देशांनी पाकिस्तानला समर्थन न देता चार हात दूर राहाणे पत्करले. 
 
बलुचिस्तान लिबरल आर्मी अधूनमधून पाक सैन्यावर हल्ले करून त्यांना स्वातंत्र्य हवे असल्याचे इशारे देत आहे. आज कुणाच्याही सहकार्याच्या अभावी एकाकी पडलेल्या पाकिस्तानला भारताने तंत्रज्ञानाचा वापर, काटेकोर नियमन करीत गुप्तचरांच्या मार्फत आवश्यक ती माहिती मिळविली आणि ऑपरेशन सिंदूर आखत पाकिस्तानला सर्वच बाबतीत माघार घेण्यास भाग पाडले हेच भारताच्या युद्ध क्षमता आणि युद्ध सज्जतेचे यश आहे असेच म्हणावे लागेल. 
 
राजन पांजरी, जोगेश्वरी.

Related Articles