सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास अखेर मिळाला मुहूर्त   

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

पुणे : सिंहगड रस्त्यावरील (नरवीर तानाजी मालुसरे विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएट या दरम्यानचा उड्डाणपुल खुला करण्यास अखेर मुहुर्त मिळाला आहे. या एकेरी उड्डाणपुलाचे  उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गुरुवारी सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे राजाराम पुलाकडून वडगावच्या दिशेने जाणार्‍या वाहन चालकांची महाराष्ट्र दिनी वाहतुक कोंडीतून मुक्तता होणार आहे.
 
सिंहगड रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने राजाराम पूल चौक ते फन टाईम थिएटर या दरम्यान अडीच किलो मीटर लांबीच्या उड्डाणपूलाचे काम हाती घेतले आहे. या उड्डानपुलाचे काम २१ सप्टेंबर २०२१ मध्ये सुरु करण्यात आले असून ७१ पिलर्स आणि १०६ गर्डर असलेल्या या उड्डानपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
 
विठ्ठलवाडीकडून स्वारगेटकडे येण्यासाठी राजाराम पुल चौकात उभारलेला उड्डाणपुल यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटर या दरम्यान एकेरी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. तर माणिकबाग ते विठ्ठलवाडी या दरम्यानच्या एकेरी पुलाच्या दोन्ही बाजूच्या रँम्पचे काम सुरू आहे.
 
विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटर या दरम्यानचा उड्डाणपुल मार्च अखेर माणिक बाग ते विठ्ठलवाडी या दरम्यान उड्डाणपुल डिसेंबर अखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटर या दरम्यानचा उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही केवळ उद्घाटनासाठी केवळ नेत्यांची वेळ मिळत नसल्याने तो वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. उड्डाणपुलाचे  उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे, यासाठी भाजपचे नेतेमंडळी प्रयत्नशील होते.  उद्घाटनाचे मुहुर्त ठरल्याचेही भाजपकडून सांगण्यात येत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी २७ एप्रिल रोजी उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यातच दोन दिवस मुख्यमंत्री शहरात होते, त्यामुळे उड्डाणपुलाचे  उद्घाटन होईल अशी आशा होती. मात्र, उद्घाटन झाले नाही. त्यामुळे समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली.
 
त्यानंतर तातडीने सूत्रे हालली आणि उड्डाणपुलाच्या  उद्घाटनाचा मुहुर्त अखेर १ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे ठरले. त्यामुळे महाराष्ट्रदिनी राजाराज पुल चौकातून वडगावच्या दिशेने जाणार्‍या वाहन चालकांची कोंडीतून सुटका होणार आहे.

मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल 

पुणे  : अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन आज शहराच्या मध्यवर्ती भागातील बुधवारी वाहतूक बदल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी रस्ता, गणेश रस्ता तसेच लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात आला असून, या भागातील पीएमपी बससेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
 
अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे, बुधवारी सकाळी सात ते रात्री बारा यावेळेत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. 
 

Related Articles