सजगतेशिवाय पर्याय नाही (अग्रलेख)   

पहलगाममध्ये पर्यटकांचे हत्याकांड घडविणारे पाकिस्तानी लष्कराच्या पॅरा कमांडो तुकडीतील असल्याची माहिती पुढे आली आहे. भारतातील मोठ्या दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानी लष्कराचा सहभाग सिद्ध झाला. पहलगामही अपवाद नाही. 
 
पहलगाममधील हल्ल्यानंतर युद्धाचे ढग दाटत आहेत. नेमके कोणत्या पद्धतीने भारताकडून पाकिस्तानला उत्तर दिले जाईल, याबद्दल तर्कवितर्क सुरु आहेत. समाजमाध्यमांची चलती असल्याने कोणीही उठावे आणि सरकारने काय करावे याबद्दल सल्ला देऊन मोकळे व्हावे, असे चित्र दिसते. माध्यमांचा, विशेषतः दूरचित्रवाणी वाहिन्यांचा उत्साह आणि आवाज टिपेला पोहोचला. त्यावरील चर्चा कर्णकटू तर आहेतच; पण देशाचे हित कितपत साधणार्‍या आहेत, याचीही शंका येते. पाकिस्तानातील कोणती ठिकाणे भारताचे लक्ष्य राहणार आहेत, इथपासून सरकार आणि लष्कर यांच्या संपूर्ण व्यूहरचनेची आपल्यालाच माहिती आहे, असा अनेक वाहिन्यांचा पवित्रा दिसतो. या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांसाठी विशेष पत्रक काढण्याची वेळ केंद्र सरकावर आली! सैन्य दले आणि संरक्षण यंत्रणा एखादी मोहीम पार पाडत असताना त्याचे थेट चित्रण अथवा प्रसारण करू नये, असे केंद्राने बजावले आहे. संरक्षण दलाच्या मोहिमांबद्दल त्यांचे अधिकृत प्रवक्ते जी माहिती देतील, तीच प्रमाण राहील, असे स्पष्ट करतानाच अन्य मार्गांनी आलेल्या माहितीची खातरजमा केल्याशिवाय ती प्रसारित करू नये, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सुरक्षा यंत्रणांची प्रत्येक हालचाल टिपून ती वाहिन्यांवर दाखविली जात होती. मुंबईत सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांवर पाकिस्तानातून लक्ष ठेवून असणार्‍यांना याचा फायदा झाला.  आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली सुरु असताना स्थानिक घरभेद्यांपासून सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. पहलगाममधील घटनेत थेट सहभाग असलेल्या दहशतवाद्यांपैकी बहुतेकांची घरे सुरक्षा यंत्रणांनी उडवून दिली; पण त्यांना मदत करणार्‍या स्थानिकांचे काय? सुरक्षा यंत्रणा कोठे कमी आहे? 

स्थानिकांची मदत

दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी पहलगाममधील कोणते ठिकाण सुरक्षित आहे, हे दहशतवाद्यांना समजले होते. ती माहिती स्थानिकांच्या मदतीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणे केवळ अशक्य होते. तपासामध्ये याला स्पष्ट दुजोरा मिळाला.  आतापर्यंत शेकडो स्थानिक नागरिकांची तपासणी झाली. पंधरा नागरिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचे उघड झाले असून ही संख्या वाढल्यास आश्चर्य नाही. दहशतवाद्यांचे हस्तक म्हणून काम करणार्‍यांवर छाप्यांचे सत्र सुरु आहे. काश्मीरची ओळख वेगळी, संस्कृती वेगळी, असा कर्कश्य सूर १९४७ नंतर लावण्यात आला. परिणामी राज्य आणि देशाच्या हितापेक्षा धर्माच्या नावावर रक्ताचे सडे वाहण्यास तेथे अनेक युवक तयार होतात. भारतातील प्रत्येक प्रांत वैशिष्ट्यपूर्ण आहे, खास संस्कृतीची परंपरा असलेला आहे; मात्र काश्मीरप्रमाणे तेथे विसंवादी सूर उमटल्याचे फार क्वचित पाहायला मिळेल. पहलगाममधील नराधमांनी पर्यटकांचा ओघ थांबवून काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला आणि सुबत्तेकडे सुरु झालेल्या प्रवासालाच नख लावले. पाकिस्तानला तेच अपेक्षित आहे. अल्पसंख्याक- बहुसंख्याक एकमेकांविरुद्ध उभे ठाकावेत, हे पाकिस्तानने अवलंबलेले जुने तंत्र. पाकिस्तानातून येणारे घुसखोर आणि व्हिसा घेऊन येथे दीर्घकाळ राहणारे पाकिस्तानी नागरिक, धार्मिक तेढ निर्माण करण्यात अडथळा तर आणत नाहीत ना? हे यापूर्वीच पाहिले जाणे गरजेचे होते. आता जाग आल्यावर कारवाई सुरु आहे. ती करताना पाकिस्तानातील धार्मिक छळाला कंटाळून येथे आलेल्या नागरिकांचा अपवाद करावा लागेल. पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्करप्रमुख उघडपणे तेथील हिंदू धर्मींयांना लक्ष्य बनवीत असल्याने पुढच्या काळात या नागरिकांची जबाबदारी भारताला अपरिहार्यपणे घ्यावी लागणार आहे.  पाकिस्तानातील युवकाशी विवाह करून भारतीय नागरिकत्व कायम ठेवायचे, अशी उदाहरणे मोठ्या संख्येने असून यापुढच्या काळात भारताला त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 
 

Related Articles