दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावू   

मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरल्याची उमर यांची खंत

जम्मू : जम्मू-काश्मीर विधानसभेने सोमवारी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर केला. दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्याचा दृढनिश्चयदेखील यावेळी करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून आपण कमी पडलो, पर्यटकांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पाठवू शकलो नाही, असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला सांगितले.
 
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी मांडलेला हल्ल्याचा निषेध करणारा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. अधिवेशनाच्या सुरुवातीला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.
 
जम्मू आणि काश्मीरची विधानसभा सर्व नागरिकांसाठी शांतता, विकास आणि सर्वसमावेशक समृद्धीचे वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच, देशातील आणि जम्मू आणि काश्मीरमधील जातीय सलोखा आणि प्रगती बिघडवू पाहणार्‍यांच्या नापाक मनसुब्यांना निर्धाराने पराभूत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ठरावात म्हटले आहे. ठरावावरील चर्चेला उत्तर देताना उमर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.तसेच, मुख्यमंत्री आणि पर्यटक मंत्री म्हणून पर्यटकांना सुरक्षित त्यांच्या घरी पाठवू शकलो नाहीत. यात मी अपयशी ठरलो, अशी कबुली दिली. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेची जबाबदारी येथे निवडून आलेल्या सरकारची नाही, असे सांगतानाच उमर यांनी, दहशतवादी हल्ल्याचे कारण पुढे करुन राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी मी करणार नाही, असे सांगितले. 
 
पहलगाममधील हल्ला संपूर्ण देशावर झालेला आहे. अरुणाचलपासून गुजरातपर्यंत आणि जम्मू-काश्मीरपासून ते केरळपर्यंत सर्वांनाच हल्ल्याचा फटका बसला आहे, असेही ते म्हणाले.२१ वर्षांनंतर सामान्य नागरिकांवर झालेला हा मोठा हल्ला आहे. पुन्हा असा हल्ला कधी होईल, हे सांगता येत नाही. मात्र, पहलगाममध्ये ज्यांनी जीव गमावला, त्यांच्या कुटुंबीयांची क्षमा मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असेही उमर म्हणाले.
 
या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली. कोणत्याही पक्षाने किंवा संघटनेने यासाठी पुढकार घेतला नाही. मात्र, आक्रोश आणि दुःख प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होता, असेही ते म्हणाले.

आता चर्चा नको;अखेरची लढाई करा

श्रीनगर : पाकिस्तानने मानवतेची हत्या केली. आता चर्चा नव्हे, तर   पाकिस्तानशी अखेरची लढाई करावी. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून आता भारताने बालाकोटपेक्षाही कठोर कारवाई करावी, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी सोमवारी केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, मला वाईट वाटते की, आपल्या शेजार्‍याला अजूनही हे समजलेले नाही की त्यांनी मानवतेची हत्या केली आहे. काश्मीर पाकिस्तानचा भाग होईल, असे त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे. आम्ही १९४७ मध्ये पाकिस्तानात गेलो नाही, मग आता का जाऊ? भारताने १९४७ मध्येच द्विराष्ट्र सिद्धांत नाकारला होता आणि आजही तो स्वीकारण्यास तयार नाही. कारण देशात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन हे सर्व एक आहेत. पाकिस्तान म्हणत आहे की चर्चा व्हायला हवी. आता काय चर्चा करणार? मी नेहमीच चर्चेला प्राधान्य द्यायचो, पण, अशा परिस्थितीत चर्चा होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

Related Articles