भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'   

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून पाकिस्तान विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्याच दिवशी या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली. पण, भारताने त्या दिवसापासूनच कारवाईला सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या घरांवर कारवाई केली, पाकिस्तानविरोधात कारवाई सुरू केली. ही कारवाई पाहून आता टीआरएफने यू-टर्न घेतला आहे. 
 
टीआरएफ आता घाबरले आहेत. लष्कर-ए-तय्यबाशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनेने आणखी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये टीआरएफने बैसरन पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपला सहभाग नाकारले आहे.टीआरएफने आपल्या आधीच्या विधाना पासून यू-टर्न घेत म्हटले आहे की, हल्ल्यानंतर लगेचच कोणीतरी त्यांचे सोशल मीडिया हँडल हॅक केले आणि पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा करणारी पोस्ट शेअर केली.
 
आता टीआरएफने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. 'पहलगाम घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही, असा यात दावा केला आहे. तर भारतीय सुरक्षा एजन्सींचा असा विश्वास आहे की, वाढता दबाव पाहून पाकिस्तानने अचानक आपली रणनीती बदलली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दहशतवादी हल्ल्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर टीआरएफला त्यांचे विधान बदलण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तानच्या आयएसआयच्या दबावाखाली, टीआरएफने एक नवीन विधान जारी करून यू-टर्न घेतला. दहशतवादी हल्ल्याच्या चार दिवसांनंतर, टीआरएफने त्यांच्या अधिकृत लेटरहेडवर एक निवेदन जारी केले आहे.

सैफुल्ला कसुरीनेही एक व्हिडिओ शेअर केला होता

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर-ए-तैयबाचा उपकमांडर सैफुल्लाह कसुरीने एक व्हिडिओही शेअर केला होता. व्हिडिओमध्ये बोलताना, त्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कोणताही सहभाग नसल्याचे नाकारले, परंतु गुप्तचर सूत्रांनी उघड केले आहे की, सैफुल्लाहनेच लष्कर आणि जैशच्या टॉप-५ कमांडरना दहशतवादी हल्ला करण्याचे आदेश दिले होते.
 
फेब्रुवारी २०२५ मध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यात आली होती आणि हल्ल्याची तारीख २२ एप्रिल निश्चित करण्यात आली होती. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कसुरी गावात, सैफुल्लाहने पाच कमांडरना आदेश दिले आणि नंतर ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये आले आणि पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली. या हल्ल्यात दोन काश्मिरी तरुणांनी त्याला साथ दिली.
 

Related Articles