वेळेत मदत मिळाली असती तर...   

पुणे : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या दहवाद्यांच्या हल्ल्यामध्ये पुण्यातील दोन पर्यटकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे असे मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. जगदाळे आणि गनबोटे यांना गोळी लागल्यानंतर अर्धा तास त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
गनबोटे आणि जगदाळे कुटुंबीय हे जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. पहलगाम येथील बैसरण घाटी परिसरात ते हॉटेलच्या बाहेर घोडेस्वारी करत होते. त्यावेळी, दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या अंदाधुंद गोळीबारामुळे दोन्ही कुटुंबीय एका तंबूच्या मागे लपले. त्यानंतर, दहशतवाद्यांनी जगदाळे आणि गनबोटे यांना बाजूला घेऊन त्यांना अजान म्हणण्यास सांगितले. मात्र, अजान येत नसल्यामुळे त्यांनी गोळ्या चालवल्या त्यानंतर पळापळ सुरू झाल्याचे आसावरी जगदाळे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.
 
काही दहशतवाद्यांनी स्थानिक पोलिसांचा तर, काहींनी लष्करातील जवानाचा पेहराव केला होता. दहशतवाद्यांनी एका स्थानिक तरूणावर देखील गोळ्या चालवल्या. त्यांनी कोणत्याही लहान मुलाला किंवा महिलांवर गोळीबार केला नाही. तसेच, जम्मू-काश्मीर येथे चौकाचौकात पोलिस आणि लष्कर तैनात आहे. मात्र, ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होती, त्याठिकाणी कोणीही जवान किंवा पोलिस उपस्थित नव्हते, असेही आसावरी यांनी सांगितले.
 
दरम्यान, गनबोटे यांच्या कमरेखाली गोळी लागली, तर संतोष जगदाळे यांच्या खांद्याजवळ गोळी लागली. गोळीबारानंतर, जवळपास अर्धा तास कोणतीही मदत मिळाली नाही. रूग्णवाहिका, सुरक्षा यंत्रणा वेळेत मदतीला आल्या नाही. त्यामुळे जखमी गनबोटे यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना शुगरचा त्रास असल्यामुळे रक्त थांबत नव्हते. त्यांच्या पत्नी या परस्थितील दृश्ये पाहून हादरल्या होत्या. अध्यार्र् तासानंतर गनबोटे यांना मदत मिळाली. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 

Related Articles