डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा महत्वाचा कणा   

पुणे : फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात सामाजिक विषमतेला थारा मिळता कामा नये. यासाठी डॉ. बाबा आढाव यांनी आयुष्यभर संघर्ष केला. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा डॉ. आढाव हे महत्त्वाचा कणा आहेत. ते शतायुषी होवोत अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाबा आढाव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
 
ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या वाढदिवसानिमित्त मार्केटयार्डातील हमाल भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पवार यांच्या हस्ते डॉ. आढाव यांना फुले पगडी, उपरणे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
 
पवार म्हणाले, एक गाव एक पाणवठा, देवदासी प्रथा निर्मूलन, पालखीतील जातिभेदाविरुद्ध आंदोलन, असंघटित कष्टकर्‍यांच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समतेचा विचार उजवण्याचा प्रयत्न असेही पवार यांनी नमूद केले. सत्याचा पुरस्कार करायचा, जेथे अन्याय असेल. तेथे प्रसंगी लोकशाहीच्या चौकटीत राहून संघर्ष करायचा. हे बाबांच्या जीवनाचे सूत्र राहिले आहे. यातूनच कष्टकर्‍यांच्या संघटना त्यांनी उभ्या केल्या. त्यांच्या जीवनात स्थिरता कशी येईल यासाठी प्रयत्न केले. यातूनच हमाल पंचायतीच्या हमाल भवन, कष्टाची भाकर, हमाल नगर, कष्टकरी विद्यालय आधी अनेक उपक्रम उभे राहिले. आणि इतरांसाठी आदर्श बनले असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. 
 
प्रतिमा परदेशी आणि किशोर ढमाले संपादित सत्यशोधक संघटकच्या डॉ. बाबा आढाव विशेषांकाचे यावेळी पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. नितीन पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुणे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, पुना मोटर गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र खेडेकर, पुणे माथाडी मंडळाचे तुकाराम चौधरी, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या अध्यक्ष सुरेखा गाडे, पथारी व्यावसायिक पंचायतीचे अध्यक्ष मोहन चिंचकर, टेम्पो पंचायतीचे भरत गेडेवाड, शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे, महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता काळेबेरे, आरोग्य सेनेचे प्रमुख अभिजीत वैद्य, रिक्षा पंचायतीचे खजिनदार प्रकाश वाघमारे, चिंचवड प्रमुख अशोक मिरगे आदींनी बाबा आढाव यांना शुभेच्छा दिल्या. हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे यांच्या पदाधिकार्‍यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

कामगारांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार 

माथाडी कायद्याच्या रूपाने सरकारला एक रुपये गुंतवावा न लागता हातावर पोट असलेल्या घटकाला दिलासा मिळेल अशी व्यवस्था आम्ही उभी केली. मात्र प्रचलित राज्य सरकार ती मोडायच्या प्रयत्न करत आहे. माथाडी कायद्याचा दुरुपयोग होतो असे सांगत दुरुपयोग करणार्‍या खंडणीबहाद्दरी करणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी जगात नावाजलेल्या माथाडी कायद्यालाच नख लावायचा प्रयत्न सुरू आहे. सरकारच्या या भूमिकेची कार्यकर्ता म्हणून चिंता वाटते. मात्र वय कितीही झाले तरी कामगारांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. माथाडी कायदा टिकावा म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने टोकाचा संघर्ष करू.
 
- डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते
 

Related Articles