मुसळधार पावसामुळे चाकणमधील जनजीवन विस्कळीत   

चाकण, (वार्ताहर) : चाकण शहर आणि परिसरात मागील तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे सखल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. अनेक गृहप्रकल्पांमध्ये पाणी शिरले असून, नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. 
 
हवामान विभागाने पुणे, चाकण शहर आणि परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कालपासून पावसाने शहराला झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
 
दरम्यान, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चाकण नगरपरिषद, प्रशासकीय  अधिकार्‍यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात उद्बभवणार्‍या आपत्कालीन परिस्थितीचा विचार न करता पावसाळा पूर्व कामाकडे दुर्लक्ष केले. नाले सफाई, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्ताच्या कडेला चर खोदाई आदी कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांमध्यये नाराजीचे वातावरण आहे. काही ठिकाणी जलवाहिनीच्या कामासाठी खोदलेले खड्डे असल्याने त्यातही पाणी साचून राहिल्याने ते डास निर्मिती केंद्र झाले आहे. 
 
पुणे-नाशिक रस्त्यावर असणार्‍या सावता माळी चौक येथे उड्डाणपुलाखाली असणार्‍या सेवा रस्त्यावर पावसाचे पाणी साचून अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. तीच परिस्थिती चाकण शहरातील अंतर्गत रस्त्यावर असणार्‍या पृथ्वी प्रस्थ इमारती समोरील रस्त्यावर  देखील होती.पुणे-नाशिक महामार्गावर वाकी येथे चाकण बाजूकडून खेडकडे जाताना सुंबरे नगरमध्ये असणार्‍या डावीकडील ओढा पूर्णपणे बुजविल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती.  
 

Related Articles