वादळातील संयत चेहरा!   

चर्चेतील चेहरे 

आपले स्वतःचे कर्तृत्व काय; एकूण समाजजीवनात आपले योगदान काय याचा कसलाही विचार न करता कोणावरही शेलकी, असभ्य, अर्वाच्य शेरेबाजी करणे; कोणाचीही पातळी सोडून खिल्ली उडविणे हे ट्रोल करणार्‍यांचे व्यवच्छेदक लक्षण. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनाही या वावदूक ट्रोलधाडीने सोडले नाही हा त्यातील अत्यंत उद्वेगजनक भाग. 
 
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिमेद्वारे पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानने आगळीक करण्याचा केलेला प्रयत्न भारताने तितक्याच निर्धाराने हाणून पाडला. हे सगळे होत असताना चेकाळलेली माध्यमे अतिरंजित माहिती प्रसृत करत असताना आणि वावदूक समाजमाध्यमवीर शेलकी शेरेबाजी करत असताना सरकारतर्फे अधिकृत माहिती देण्यासाठी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांची निवड सरकार व संरक्षण दलाने केली होती; तशीच परराष्ट्र सचिव विक्रम  मिस्री यांचीही केली होती. या तिघांनी आपल्या निवेदनात कोणताही अभिनिवेश; आक्रस्तळेपणा येऊ दिला नाही. १० मे रोजी संघर्षविरामाची घोषणा कारणात आली. त्याची माहिती मिस्री यांनीच पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर मात्र ट्रोलधाडीने मिस्री यांनाच लक्ष्य केले.
 
जणू काही तो निर्णय मिस्री यांनीच घेतला असावा अशा रीतीने या उन्मादी ट्रोलकरांनी मिस्री यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची  निंदानालस्ती केली; त्यापुढे जाऊन त्यांची वैयक्तिक आणि खासगी माहिती प्रसृत केली. या निर्लज्ज ट्रोलकरांनी मिस्री यांच्यावर देशद्रोही इत्यादी आरोप केलेच; पण त्यांच्या लंडनस्थित कन्येलाही लक्ष्य केले. त्यांची कन्या एका कायदेशीर सल्ला देणार्‍या फर्ममध्ये कार्यरत आहे. त्या फर्मने रोहिंग्या निर्वासितांना कायदेशीर साहाय्य दिले होते; त्याचाही उल्लेख करण्यात आले. हे सर्व ट्रोल करणारे प्रामुख्याने सत्ताधीशांच्या विचारसरणीचे असूनही सरकारमधील एकालाही मिस्री यांची पाठराखण करण्याची बुद्धी झाली नाही. ज्यांनी मिस्री यांची पाठराखण केली त्यांत शशी थरूर, असिदुद्दीन ओवेसी, अखिलेश यादव असे विरोधक होते. मिस्री यांनी मात्र कोणतीही आततायी प्रतिक्रिया देणे टाळले. आपली सभ्यता त्यांनी ढळू दिली नाही; ना आपली व्यावसायिक निष्ठा झाकोळली जाऊ दिली नाही. मिस्री यांना ओळखणारे त्यांच्या याच गुणवैशिष्ट्याचा आवर्जून उल्लेख करतात.
 
मिस्री यांची परराष्ट्र खात्याच्या सचिव पदी १५ जुलै २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली. याचा अर्थ त्यास एक वर्षही उलटलेले नाही. तथापि त्यांची राजनैतिक अधिकारी म्हणून कारकीर्द तीन दशकांहून जास्त काळाची आहे. श्रीनगर येथे ७ नोव्हेंबर १९६४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण जम्मू-काश्मीरमध्ये बर्न हॉल स्कूल आणि नंतर श्रीनगर स्थित डीएव्ही शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी ग्वाल्हेर येथील सिंदिया स्कूल येथे प्रवेश घेतला. दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयात पदवीधर झालेले मिस्री यांनी जमशेदपूरस्थित झेवियर्स व्यवस्थापन संस्थेतून व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अर्थात त्यानंतर ते लगेचच परराष्ट्र सेवेत दाखल झाले नाहीत. तीन वर्षे त्यांनी लिंटास व तत्सम प्रसिद्ध जाहिरात कंपन्यांमध्ये काम केले. भारतीय परराष्ट्र सेवेचे ते १९८९ सालच्या तुकडीचे अधिकारी आहेत.
 
तेथे दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली. परिणामतः केवळ परराष्ट्र मंत्रालयातच नव्हे तर पंतप्रधान कार्यालयात देखील काम करण्याची संधी त्यांना मिळाली. परराष्ट्र खात्याच्या पाकिस्तानविषयक विभागात १९९८ मध्ये त्यांची नियुक्ती उप सचिव पदावर झाली.  इंदर कुमार गुजराल आणि प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र खात्याचे मंत्री असताना मिस्री यांनी त्या खात्यात काम केले होते. याच काळात भारत-अमेरिका आण्विक कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले याची दखल अवश्य घेतली पाहिजे. याचे कारण असे करार होताताना पडद्याआड अनेक घडामोडी घडत असतात आणि परराष्ट्र खात्यातील अधिकारी हे त्यासाठी अहोरात्र झटत असतात.
 
पंतप्रधान कार्यालयात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात १९९६ मध्ये गुजराल यांनी त्यांना आपले खासगी सचिव नियुक्त केले. त्या पदावर ते वर्षभर होते. २००१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांच्यादरम्यान झालेल्या आग्रा शिखर परिषदेच्या वेळी  मिस्री हे ‘फर्स्ट सेक्रेटरी’ होते. २००८ ते २०१२ या काळात मिस्री श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तालयात कार्यरत होते; जर्मनीत म्युनिच येथील भारतीय वाणिज्य दूतावासात देखील त्यांनी काही काळ काम केले. २०१२ मध्ये पंतप्रधान कार्यालयात ते उपसचिव झाले. डॉ मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दोन वर्षे मिस्री त्यांचे खासगी सचिव होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांचेही खासगी सचिव म्हणून काम करण्याची संधी मिस्री यांना मिळाली. या सगळ्याचा अर्थ एकच; तो म्हणजे सत्तेत पक्ष कोणताही असो; मिस्री यांच्यावर सर्वांचाच विश्वास होता आणि अद्याप आहे. मिस्री यांची प्रदीर्घ कारकिर्दीची ती खरी मिळकत असेच म्हटले पाहिजे.
 
ब्रसेल्स, ट्युनिस, इस्लामाबाद, वॉशिंग्टन येथे भारतीय वाणिज्य दूतावासात मिस्री यांनी काम केले असल्याने जागतिक राजकारण आणि मुत्सद्देगिरीचा मोठा अनुभव तयांच्या गाठीशी  आहे. पण त्यापलीकडे जाऊन अनेक महत्त्वाच्या राष्ट्रांत भारताचे राजदूत म्हणून धुरा सांभाळण्याची संधी त्यांना मिळाल्याने जगाचा पैस आणि त्यात भारताची भूमिका याचेही सम्यक आकलन त्यांना झाले असणार.२०१४ मध्ये केंद्र सरकारने त्यांची नियुक्ती स्पेन येथील भारताच्या राजदूतपदी केली तर २०१६ मध्ये म्यानमार येथे ते भारताचे राजदूत म्हणून नियुक्त झाले. पुढे २०१९ मध्ये त्यांना चीनमधील भारतीय राजदूत म्हणून नेमण्यात आले. त्याच काळात भारत-चीन संबंध तणावपूर्ण अस्वस्थेत होते. विशेषतः २०२० मध्ये गलवान येथे भारत-चीन संघर्ष झाला तेंव्हा वाटाघाटींचा मार्ग खुला ठेवण्याच्या दृष्टीने चीनमधील भारताचे राजदूत म्हणून मिस्री यांची महत्त्वाची भूमिका होती. २०२४ च्या ऑक्टोबर महिन्यात भारत आणि चीन यांच्यात सीमेवरील सैनिकांची संख्या कमी करण्यावर एकमत झाले तेंव्हा ती घोषणा परराष्ट्र सचिव म्हणून मिस्री यांनीच केली होती.ऑक्टोबर २०२४ नंतर काहीच महिन्यांत ते पुन्हा चीनच्या दौर्‍यावर वाटाघाटींसाठी गेले होते आणि चीनने देखील त्यांच्या भेटीचे स्वागत केले होते. चीनविषयक तज्ज्ञ म्हणून मिस्री यांचा लौकिक आहे हे निराळे सांगावयास नको. २०२२ च्या जानेवारी महिन्यात त्यांना सरकारने नवीन जबाबदारी दिली; ती म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पदाची. अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली ते कार्यरत होते. त्यानंतरच त्यांची नेमणूक परराष्ट्र सचिवपदी करण्यात आली.
 
मिस्री यांची ही सर्व कारकीर्द प्रदीर्घ आहेच; पण त्याबरोबरच वैविध्यपूर्ण आणि म्हणूनच अनुभवसंपन्न आहे. त्याला त्यांच्या अभ्यासूपणाची आणि संयतपणाची जोड आहे. ऑपरेशन सिंदूर युद्धभूमीत आकार घेत असताना देशाला आणि जगाला वस्तुनिष्ठ माहिती कोणताही अभिनिवेश न आणता पण तरीही निर्धाराचे पुरेसे दर्शन घडवीत दिल्यामुळे मिस्री यांची लोकप्रियता कमालीची वाढली होती. मात्र शास्त्रसंधीची माहिती त्यांनीच दिल्यानंतर त्यांच्यावर अवमानास्पद शेरेबाजी ट्रोलकरांनी केली. त्यानंतर देखील मिस्री यांनी आपला संयम ढळू दिला नाही. खरे म्हणजे असल्या कुचाळकी ट्रोलकारांपेक्षा पाकिस्तान, दहशतवादी यांच्याविषयी राग मिस्री यांच्या मनात किती तरी पटींनी जास्त असणार. याचे कारण त्याची झळ ते आणि त्यांचे कुटुंबीय यांनी प्रत्यक्ष सोसली आहे. दहशतवादी कारवायांमुळे काश्मिरी पंडितांना काश्मीर खोर्‍यातून १९९० च्या दशकात पलायन करावे लागले होते. मिस्री आणि त्यांचे कुटुंबीय त्यापैकीच. त्यांना ट्रोलकरांनी अक्कल शिकवावी हे उफराटेच.
 
‘मिस्री यांनी आपल्या वेदनेचे आणि संतापाचे रूपांतर द्वेषात होऊ दिले नाही; तर ते त्यांनी ध्येयवादात केले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्धचा त्यांचा आवाज कटुतेने भरलेला नाही; नाही तर सत्याने ओतप्रोत आहे.. ते समुदायांवर आरोप करत नाहीत; ते द्वेषाच्या विचारसरणींचा, निषेध करतात’, असे दीर्घ राजनैतिक कारकीर्द असलेले व्ही बी सोनी यांनी एका लेखात लिहिले आहे. हे मर्म जाणून न घेता ट्रोलकरांनी मिस्री यांना अश्लाघ्य भाषा वापरून लक्ष्य केले. इंग्रजी, हिंदी, काश्मिरी आणि फ्रेंच भाषा अवगत असणारे मिस्री यांची खरी भाषा आहे ती तारतम्याची. त्याचा प्रत्यय ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भांत पत्रकार परिषदांच्या वेळी प्रकर्षाने आला. कितीही आणि कोणतेही वादळ येवो; आपला संयतपणा आणि सभ्यपणा सोडायचा नाही हा मिस्री यांचा पिंड आहे. वादळातील शांत चेहरा हा विक्रम मिस्री यांचा लौकिक उगाच झालेला नाही!

Related Articles