आठ दिवसांत तीन वाहने आणि नऊ ठिकाणे बदलली   

वैष्णवी मृत्यू प्रकरण

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील आलिशान मोटारीतून मृतदेह पाहण्यासाठी औंध रूग्णालयात आले होते. त्यानंतर, पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता ओळखून ते फरारी झाले. पोलिसांना गुंगारा देताना त्यानी तीन वाहने आणि नऊ ठिकाणे बदलली. अखेर ते स्वारगेटला आले आणि पोलिसांनी त्यांना पकडले.
 
वैष्णवीचा १६ मे रोजी राहत्या घरी मृत्यू झाला. उत्तरीय वैद्यकीय तपासणीसाठी तिचा मृतदेह औंध रूग्णालयात नेण्यात आला. मृत्यूच्या दुसर्‍या दिवशी, १७ मे रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे आलिशान मोटारीतून वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी रूग्णालयात आले. दोघेही काही वेळ रूग्णालयात होते. मात्र, पोलिसांनी संशयावरून त्यांना ताब्यात न घेता जाऊ दिले. आरोपींनी १८ मे रोजी मोटार बदलली आणि ते दोघेही पिंपरीतून बाहेर पडले. तेव्हापासून ते आळंदी, वडगाव आणि लोणावळा परिसरातच होते. लोणावळा येथील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारल्याचे चित्रीकरण माध्यमांच्या हाती लागले. मात्र, माध्यमांच्या हाती लागलेले चित्रीकरण पोलिसांना तपास करत असताना का मिळू शकले नाही? असा प्रश्नदेखील विचारला जात आहे. 
 
हगवणे पिता-पुत्रांनी त्यानंतर पुन्हा एकदा मोटार बदलली. दोघांनी मोटार बदलून पुणे जिल्हा सोडण्याचे ठरवले. दोघेही १९ मे रोजी पुणे जिल्ह्यातून पलायन करून सातारा जिल्ह्यात गेले. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे त्यांनी मुक्काम केला. त्यानंतर, २० मे रोजी पुसेगाव सोडले आणि ते पसरणी मार्गे कोगनळी येथील हॉटेल हेरिटेज येथे पोहोचले. त्यांनी तेथे मुक्काम केल्यानंतर २१ मे रोजी त्यांच्याच परिचयाचे असलेले प्रीतम पाटील यांच्या शेतावर मुक्काम केला. अखेर पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात गेलेले हगवणे पिता-पुत्र २२ मे रोजी पुण्यात दाखल झाले. त्यांनी स्वारगेट परिसरातील एका ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र, २३ मे रोजी पहाटे पोलिसांना त्यांची माहिती मिळाली आणि त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले.
 
हगवणे पिता-पुत्र पुणे जिल्ह्यात बरेच दिवस असूनदेखील पोलिसांना त्यांचा थांगपत्ता लागला नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर दोन दिवस पोलिस या प्रकरणाकडे गांभीर्याने का पाहत नव्हते? बावधन पोलिसांनी कस्पटे कुटुंबाच्या तक्रारीची दखल का घेतली नाही? राजेंद्र हगवणे औंध रूग्णालयात आला होता, याबाबत पोलिसांना काहीच माहिती नव्हते का?, वैष्णवीचे बाळ तीन दिवस कुठे होते?, याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी काय तपास केला? याबाबत अद्यापही मौन का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

Related Articles