नववधूंना उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन   

कोल्हापूर : पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. नववधूंना आजही हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागते, या विदारक दृष्य असल्याचे महाराष्ट्रातील नागरिक म्हणत आहेत. यामुळे प्रेमविवाह किंवा ठरवून लग्न करणाऱ्या मुलींच्या मनात भीतीचे घर निर्माण झाले  आहे. परंतु, अशा साशंक मुली आणि नववधूंसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. ते आज काही प्रसार माध्यमांशी बोलत होते.
 
“ज्या मुलीची दु:खद घटना घडली आहे, तिच्या वडिलांशी बोललो. मी आज कोल्हापुरातील कार्यक्रम उरकून पुण्यातील त्यांच्या घरी भेटणार आहे. या दोघांचा प्रेम विवाह होता. त्या मुलीने मला सांगितले असते की, मला असा असा त्रास होतोय, तर आपण ताबडतोब कारवाई केली असती”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार आज माध्यमांना म्हणाले.
 
“माझं मुलींना आवाहन आहे की, वधू म्हणून कोणत्याही कुटुंबात जाता तेव्हा जरा जरी शंका असेलतरी त्यांनी तक्रार करावी. यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. इतके मोठे पाऊल उचलण्याची कोणावरही वेळ येणार नाही.”

आम्ही कस्पटे कुटुंबाच्या पाठीशी आहे

“पालकांनी इच्छा व्यक्त केली, त्यानुसार राज्याचे प्रमुख आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस आणि मी पुण्याचा पालकमंत्री या नात्याने जातीने लक्ष घालत आहोत. हगवणे कुटुंबातील दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे. कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही, याची काळजी पोलीस खाते घेत आहे. आम्ही कस्पटे कुटुंबाच्या पाठीशी आहे”, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

माझा दुरान्वयेही संबंध नाही

“माझा दुरान्वयेही संबंध नाही. तो पक्षाचा कार्यकर्ता होता. माझे विचार स्पष्ट आहेत सर्वाना माहितेय. जवळचा, लांबचा असो त्याचा विचार करत नाही. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. लग्न झालेल्या मुलींच्या बाजूने कायदा अधिक कडक केला आहे”, असाही पुनरुच्चार त्यांनी केला.
 
“मीडियाचे लोक माझा फोटो दाखवत आहेत, मी तुमच्या घरातील लग्नात आलो, फोटो काढला आणि काही झाले तर माझा काय दोष आहे? असे आरोप माझ्यावर होणार असतील तर मी यापुढे कोणाच्या लग्नाला नाही जाणार, असे मी बोलल्यावर समोरची लोक हसले यात माझा दोष काय?” असे ही अजित पवार म्हणाले.
 

Related Articles