देशात पुन्हा कोरोना ; दोघांचा मृत्यू   

महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू राज्यात रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक 

नवी दिल्ली: कोरोनाने पुन्हा एकदा मान वर काढली आहे. यामुळे आता भारतात देखील काळजी घेतली जात आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. भारतातही काही रुग्ण समोर आले आहेत. केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये सध्या देशातील सर्वाधिक करोना रुग्ण आढळले. ज्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक आयोजित केली आहे.
 
दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. केरळमध्ये आतापर्यंत ६९ सक्रिय कोरोना रुग्ण सापडली आहेत. तर, तामिळनाडूमध्ये ३४ सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाची ४४ सक्रिय रुग्ण आढळले. महाराष्ट्रातही आरोग्य विभाग कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. याशिवाय कर्नाटक, गुजरात आणि दिल्लीमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळल्याची माहिती आहे.
 
दिल्लीत सध्या कोरोनाचे तीन सक्रिय रुग्ण आढळले. कर्नाटक आणि गुजरातमध्ये अनुक्रमे ८ आणि ६ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त, हरियाणा, राजस्थान आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आढळला. मुंबईतही कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आशियाई देशांमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रसार झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. 

सिंगापूरमध्ये कोरोनाची चौदा हजार प्रकरणे 

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण सातत्याने नोंदवले जात आहेत. सिंगापूरमध्ये मे महिन्यातच कोरोनाचे १४ हजार सक्रिय रुग्ण आढळले. सध्या भारतात ही संख्या फक्त २५७ सक्रिय प्रकरणांपुरती मर्यादित आहे. जे लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. आरोग्य मंत्रालयाने अनेक आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे. बैठकीनंतर असे सांगण्यात आले की, सध्या भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे.
 

Related Articles