संवाद यशस्वी व्हावा (अग्रलेख)   

‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारतीय शिष्टमंडळाकडून जागतिक पातळीवर विविध देशांशी संवाद साधण्यास सुरुवात झाली आहे. दहशतवादासंदर्भात पाकिस्तानकडून सातत्याने घेतल्या जाणार्‍या दुटप्पी भूमिकेकडे जगाचे लक्ष वेधणे आणि त्या पार्श्वभूमीवर भारताला उचलाव्या लागलेल्या पावलांची माहिती देणे, हा संसद सदस्य, केंद्रीय मंत्री यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळांचा उद्देश आहे. राजनैतिक आघाडीवर पाकिस्तानचे पितळ उघड पाडण्यासाठी, त्याचबरोबर त्या देशावर आवश्यक दबाव आणण्यासाठी शिष्टमंडळ पाठविणे गरजेचे होतेच. शिष्टमंडळात सर्वपक्षीय सदस्य आहेत. पहलगाममधील हत्याकांडानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानप्रणित दहशतवादी कृत्याला कठोर उत्तर देणे आवश्यक होते. भारताने दिलेल्या प्रत्युत्तराचे देशात पक्षभेद विसरून स्वागत झाले. सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा जागतिक दौरा, हा त्याच सामंजस्याचा भाग. काँग्रेसचे नेते शशी थरूर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे व अन्य, वेगवेगळ्या सात शिष्टमंडळांचे नेतृत्व करणार आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी हिंदु धर्मीयांविरूद्ध जाहीरपणे गरळ ओकली आणि त्यापाठोपाठ पहलगाममधील दहशतवादी हल्ला घडविण्यात आला. सैन्य दलांकडून पाकिस्तानला तडाखा देण्यात आला, देशात असलेले पाकिस्तानी हेरांचे जाळे उद्ध्वस्त केले जात आहे. सिंधु जल कराराला भारताने स्थगिती दिली आहे.अलीकडे पंतप्रधानांच्या उपस्थितीत केरळमध्ये झालेल्या कार्यक्रमास थरुर उपस्थित होते. काँग्रेसने शिष्टमंडळासाठी थरुर यांचे नाव सुचविले नसताना देखील केंद्र सरकारने त्यांचा समावेश केला, हे सूचक होय.

काँग्रेसमध्ये थरूर अस्वस्थ

पाकिस्तान सरकार आणि लष्कर हेच जगातील दहशतवादाचे मूळ आहे, हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. अशावेळी पक्षीय मतभेदांना स्थान असता कामा नये. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानचे हवाई तळ, दहशतवाद्यांचे तळ बेचिराख केल्यावर अचानक झालेला सशस्त्र संघर्ष बंदीचा निर्णय देशात अनेकांना रुचला नाही; मात्र भारताने आपले उद्दिष्ट पूर्ण साध्य केले, अशी परिपक्व भूमिका घेऊन काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. काँग्रेसचे दुसरे एक वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्धनीतीचे कौतुक केले. सर्वपक्षीय शिष्टमंडळासंदर्भात केंद्राकडे विविध पक्षांकडून आपापल्या संसद सदस्यांची नावे देण्यात आली. काँग्रेसकडून आलेल्या यादीत माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, पक्षाचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई, नासिर हुसेन, पंजाबमधील राजा अमरिंदरसिंग वारिंग यांचा समावेश होता. राजकीय स्थितीचे अचूक आकलन, संवाद कौशल्य, समर्थ युक्तीवादाची हातोटी हे गुण असलेल्या शशी थरुर यांचे नाव देण्यास हरकत नव्हती; पण अलीकडच्या काळात पक्षाला फार रुचणार नाहीत, अशी विधाने थरुर यांच्याकडून झाली. ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत, हे स्पष्ट झाले आहे. आपल्या प्रतिभेला पक्षात योग्य वाव मिळत नाही, अशी त्यांची भावना बनली आहे. थरुर केरळचे. तेथे पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होतील. सलग दोनदा केरळमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. पराभवाची ‘हॅटट्रिक’ टाळण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे. भाजपला केरळमध्ये स्थान मिळवायचे आहे. थरुर यांची अलीकडची भूमिका आपल्याला अनुकूल ठरु शकते, असे भाजपच्या नेत्यांना वाटते. अलीकडे पंतप्रधानांच्या उपस्थितीत केरळमध्ये झालेल्या कार्यक्रमास थरुर उपस्थित होते. काँग्रेसने शिष्टमंडळासाठी थरुर यांचे नाव सुचविले नसताना देखील केंद्र सरकारने त्यांचा समावेश केला, हे सूचक होय. काँग्रेस असो अथवा भाजप, पाकिस्तानच्या विषयात कोणीच पक्षीय मतभेद आणता कामा नयेत. देशाची तीच अपेक्षा आहे. शिवसेना उद्धव गटाचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी शिष्टमंडळाला सर्वपक्षीय स्वरूप नाही, असा आक्षेप घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षीय भेद येथे असू शकत नाहीत, असे सुनावले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रगल्भता दाखवून पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी कसब पणाला लावणे आवश्यक आहे. केवळ भारतासाठच नव्हे, तर जगासाठी पाकिस्तान धोकादायक बनला आहे. जागतिक दहशतवादाच्या या सूत्रधाराला भारताचा दृढ निश्चय नेस्तनाबूत करु शकेल.
 

Related Articles