पुन्हा दहशतवादी हल्ला केल्यास पाकिस्तानला धडा शिकवू...   

पुणे : ’ऑपरेशन सिंदूर’ नंतर ८ मे पासून भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षाला अखेर शनिवारी विराम देण्याचे ठरवण्यात आले. दोन्ही देशातील शस्त्रसंघर्षाची पहिली घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. मात्र, पाकिस्तानी दहशतवाद्यांना कायमचा धडा शिकवण्याची हीच ती वेळ होती, अशी जनभावना आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची स्थळे, लष्करी, रडार केंद्रे आणि हवाई स्थळे उध्वस्त करून भारतीय लष्कराने काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. सध्या या युध्दाला पूर्णविराम देण्यात आला आहे. मात्र, यापुढे भारतावर दहशतवाद्यांकडून हल्ला झाल्यास पाकिस्तानला चांगला धडा शिकवू, अशा संतप्त प्रतिक्रिया माजी लष्करी अधिकार्‍यांनी दिल्या आहेत.
 
पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळे उद्ध्वस्त करून भारताने काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. अगदी स्पष्टपणे सांगायचे झाले तर हे निर्णयाक युध्द होते. १९८४-८५ मध्ये पाकिस्तानकडे अणवस्त्रे आणि क्षेपणास्त्रे नव्हती. पण आज शस्त्रास्त्रे दोन्ही देशांकडे आहेत. त्यामुळे देशाचा पुढील विचार करून सर्वकश युध्द करता येत नाही. सिमित युध्द करूनच भारताने दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणे हेच भारताचे उद्दिष्ट होते. कदाचित या युध्दात अणवस्त्रांचा वापर केला गेला असता तर त्याचे परिणाम दोन्ही देशांना दिर्घकाळापर्यंत भोगावे लागले असते. दोन्ही देशांतील लाखांहून अधिक लोक मारले गेले असते. मोठी वित्तहानी झाली असती. यापुढे हल्ला झाल्यास भारतीय लष्कर सज्ज आहे.

- अनिल आठले (निवृत्त कर्नल) 

भारत सरकारने पाकिस्तानला चांगला धडा शिकविला आहे. पाकिस्तान हा कायम दहशतवाद्यांना पोसत आला आहे. त्यांना मदत करीत आहे. त्यामुळे पाकिस्तानला आंतकवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या भारताने जनहित लक्षात घेऊन युध्दाला पूर्णविराम दिले आहे. मात्र, पाकविरोधातील युध्द कायमचे थांबविलेले नाही. यापुढे दहशतवादी कारवाया सुरू राहल्यास भारत त्याला यापेक्षा अधिक मजबूतीने सडेतोड उत्तर देईल. भारताने विमान हल्ले आणि पाणी बंद करून पाकिस्तानला चांगला धडा शिकविला आहे. पाकिस्तानने यापुढे दहशतवाद्यांना खतपाणी घालण्याचे काम करू नये. अन्यथा त्याची चांगली किमत पाकिस्तानला भोगावी लागेल.

- डी. बी. शेकटकर (निवृत्त लष्कर अधिकारी) 

सद्य:स्थितीत ’ऑपरेशन सिंदूर’ बंद झालेले नाही. भारत सरकारकडून ’ऑपरेशन सिंदूर २’ ची तयारी सुरू आहे. पाकिस्तानला सिंधू नदीचे पाणी हवे असेल तर त्यांनी व्याप्त काश्मीर भारताच्या स्वाधीन करावे. याबाबतची रणनिती सध्या  भारत सरकार आखत आहे. पाकिस्तानमध्ये ’ऑपरेशन सिंदूर’ राबवून भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यास सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान काही प्रमाणात कंगाल झालेला आहे. त्यांनी इतर देशांकडे कर्जाची मागणी देखील केली आहे. यापूर्वी घेतलेल्या कर्जाचा वापर जनेतच्या कल्याणासाठी न वापरता पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठीच केला आहे. चीन कायम पकिस्तानला मदत करीत आला आहे. मात्र, भारताला याचे काही देणेघेणे नाही. दहशतवाद्यांच्या विरोधात अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. याची जाणीव पाकिस्तानला हवी.

- पी. सी. वशिष्ट (निवृत्त लष्कर अधिकारी)

भारताने अनेकदा पाकिस्तानला चपराक दिली आहे. मात्र, त्यांच्यामध्ये काहीही सुधारणा होत नसल्याचे दिसून येते. सद्य:स्थितीत भारताने युध्द जरी थांबविले असले तरी ते कायमचे बंद झालेले नाही. आताच्या युध्दात पाकिस्तान अक्षरश: घाबरून गेला आहे. त्यांची मोठी वित्तहानी देखील झाली आहे. यातून पुढे पाकिस्तानने चांगला बोध घ्यावा. अमेरिका हा भारताचा मित्र राष्ट्र असला तरी तो अधिक व्यापारी राष्ट्र आहे. इस्रायल हा भारताला कायम मदत करीत आला आहे. रशिया देखील मित्र म्हणून भारताच्या पाठिशी आहे. मात्र, तुर्की आणि मलेशिया राष्ट्रांनी भारताच्या विरोधात कायम भूमिका घेतली आहे. 

- हेमंत महाजन (निवृत्त कर्नल) 

 

Related Articles