शेतमाल विक्री व्यवस्था सक्षम करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करा   

पुणे : राज्यातील शेतकर्‍यांच्या शेतमाल विक्रीची व्यवस्था अधिक सक्षम करणे, हे पणन मंडळाचे प्रमुख कार्य आहे. राज्यात उत्पादन होणारी फळे, भाजीपाला यांचे ग्रेडिंग, पॅकिंग आणि मार्केटिंगसाठी जागतिक मार्केट व्यवस्थेशी सुसंगत उपाय करणे आवश्यक आहे. देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या शेतमालाचे मार्केटींग वाढविण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाला वर्तमान व्यवस्थेशी सांगड घालून वेगाने काम करावे लागेल. राज्यातील वर्तमान शेतमाल विक्री व्यवस्था असली तरी जगाच्या कृषी माल विक्री व्यवस्थेशी स्पर्धा करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करू राज्यातील शेतमाल कृषी व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी अधिकार्‍यांनी दिले. राज्य कृषी उत्पन्न मंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
 
गुरुवारी गुलटेकडी येथे राज्य कृषी पणन संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांचा पणनमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे, सहकार आयुक्त दिपक तावरे, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, संचालक विकास रसाळ, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, व्यवस्थापक शैलेश जाधव, पणन मंडळाचे सदस्य नारायण पाटील, संचालक संजय पाटील, अन्य संचालक अधिकारी उपस्थित होते.
 
रावल म्हणाले, शेतकर्‍यांचा सेवेसाठी पणन मंडळ कार्यरत असून, त्यांच्या हिताच्या सुविधा पुरविण्यासाठी योजना तयार करा. त्यादृष्टीने व्यवस्था उभी करण्याचे काम पणन मंडळाचे आहे. शेतकरी उपयोगी सुविधा केंद्र असावीत अशा प्रकारे सुविधा केंद्राचे अद्ययावतीकरण करा, शेतकर्‍यांच्या मालाला मूल्यवर्धन करण्याची उपाय-योजना, नियोजन, पणन मंडळाने करावे. शेतकर्‍यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा, अशी शासनाची भूमिका आहे. योजना किंवा सुविधांसाठी नागरिकांना ताटकळत ठेवण्याची मानसिकता बदलून अधिकार्‍यांनी काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
 
बाजार समित्या मजबूत, सक्षम व आधुनिक सुविधांनी युक्त व्हाव्यात यासाठी पणन मंडळाने प्रयत्न करावेत. शेतकर्‍यांना राज्यातील कोणत्याही बाजार समितीतील खरेदी विक्रीचे दर कोणत्याही बाजार समितीत उपलब्ध होतील. अशी यंत्रणा इ-नामच्या माध्यमांतून राबविण्यात येत आहे. ती प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक करावी. केवळ औपचारिक प्रक्रिया न राबवता बाजार समित्यांचे आर्थिक स्वास्थ्य चांगले राहिल याची खबरदारी घेऊन विकास कामांना गती द्यावी, बाजार समित्यांमधील विकास कामे करताना स्टार्टअपला संधी द्यावी, ही कामे करताना दर्जेदार होतील याकडे लक्ष देण्याचे त्यांनी निर्देश दिले. 

Related Articles