काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)   

अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला झालेला अपघात दुर्दैवी म्हणावा लागेल. एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच कोसळले. त्यातील एक प्रवासी चमत्कार म्हणूनच वाचला; मात्र २४१ प्रवासी आणि कर्मचार्‍यांवर काळाचा घाला पडला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीही त्यात दुर्दैवी ठरले. केवळ विमानातील प्रवासीच नव्हे, तर मेघाणीनगर परिसरात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावरच हे विमान कोसळल्याने वसतिगृहाच्या भोजन कक्षात एकत्र भोजन घेत असलेले २४ डॉक्टरही या अपघाताचे बळी ठरले. अवघ्या सहाशे फुटावर पोहोचले असताना हे विमान कोसळले. त्यातील प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला. या अपघाताला नेमके काय कारण ठरले याचा शोध घेतला जाईलच. हा अपघात विमानातील तांत्रिक बिघाडामुळे झाला, की मानवी चूक त्यास कारणीभूत ठरली हेही चौकशीतून पुढे येईल. हे विमान चालवणारे वैमानिक सुमीत सभरवाल हे अनुभवी वैमानिक होते. आठ हजाराहून अधिक तास विमान चालवण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे त्यांच्याकडून काही चूक घडेल असे दिसत नाही. शिवाय उड्डाणानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता आणि मदतीची अपेक्षा केली होती; मात्र नियंत्रण कक्षाकडून त्यास प्रतिसाद मिळण्याआधीच हे विमान जमिनीवर कोसळले. विमानाची ही धडक एवढी जबरदस्त होती की, वसतिगृहाचे छत फोडून विमानाचे काही भाग इमारतीत घुसले. या दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण आता तरी स्पष्ट झाले नसले तरी विमानाच्या ‘ब्लॅक बॉक्स’मधून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपघाताची तांत्रिक माहिती स्पष्ट होईल.
 
हवाई सुरक्षेतील उणिवा
 
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान रहिवासी भागात कोसळले. विमान कोसळताच त्याला भीषण आग लागली. प्रत्येक अपघात हा विमान सुरक्षा व्यवस्थेतील उणिवांवर प्रकाश टाकत असतो, त्यातून काही शिकून भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करणे अपेक्षित असते. अपघातग्रस्त विमानाच्या इंजिनामध्ये बिघाड झाला होता का? तो अचानक झाला की त्याची पूर्वसूचना मिळाली होती, आणि विमानाची नियमित देखभाल योग्य प्रकारे झाली होती की नव्हती? विमान उड्डाण करण्यापूर्वीची तांत्रिक तपासणी झाली होती की नाही? त्या तपासणीत काही उणिवा राहिल्या होत्या का? इंजिनातील बिघाडात दुरुस्तीची गरज होती का? आपत्कालीन परिस्थितीत विमानाचे नियंत्रण करण्यात काही अपयश आले का? या सर्व कारणांचा विचार केल्यानंतरच अपघाताचे वास्तव समोर येईल. या अनुषंगाने हवाई सुरक्षेचा मुद्दाही विचारात घेणे आवश्यक आहे. एके काळी विमान प्रवास ही मूठभर श्रीमंतासाठी चैन होती. आता उंचावलेल्या जीवनमानामुळे विमान प्रवास सामान्यांच्याही आवाक्यात आला आहे. विमान सेवेचा विस्तार होत आहे. अहमदाबादच्या विमानतळानजीक नागरी वसाहतीचा दाट वस्तीचा भाग आहे. अपघातानंतर हे विमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीतच घुसले हे लक्षात घेता नागरी वसाहतीपासून दूर अंतरावर विमानतळ असणे हेच व्यावहारिक ठरते. विमानातील प्रवाशांची सुरक्षितता जशी महत्त्वाची ठरते, तशीच ती विमानतळ परिसरातील लोकांचीही महत्त्वाची ठरते. विमान कंपन्यांतील अपुरे कर्मचारी, कालबाह्य केबिन रचना, निकृष्ट सेवा, वैमानिकाच्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्याचा विचार या बाबींचाही विचार होणे गरजेचे आहे. वैमानिकांचे विश्रांतीचे तास कमी करण्याचे प्रयत्न होत असल्याची वैमानिकांची तक्रार रास्त म्हणावी लागेल. अपघातानंतर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी हवाई वाहतूक खात्याची उड्डाणाबाबतची नियमावली जागतिक दर्जाची असल्याचे आणि तिची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असल्याचे म्हटले आहे, तरीही हा अपघात का झाला, हे प्रश्न अनुत्तरितच राहतात.

Related Articles