महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल   

शिवसेना-मनसे युतीबाबत उद्धव यांचे वक्तव्य

मुंबई,  (प्रतिनिधी) : अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीची, ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी, महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, कुठलेही संकेत न देता थेट बातमीच देऊ, असे वक्तव्य करत या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. मनसेने मात्र सावध भूमिका घेतली असून, २०१४ आणि १७ लाही महाराष्ट्राच्या मनात हेच होते. प्रसारमाध्यमांसमोर बोलून काही होणार नाही, प्रस्ताव पाठवा, विचार करू, तुम्ही एक पाऊल पुढे आलात तर राज ठाकरे शंभर पावलं पुढे येतील, अशी प्रतिक्रिया मनसे नेत्यांनी दिली.
 
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज यांनी उद्धव यांना एकत्र येण्याची साद घातली होती. त्याला उद्धव यांनी लगेच प्रतिसादही दिला होता. परंतु, नंतर याबाबत दोन्हीकडून कोणी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे मनोमिलनाची चर्चा नेहमीप्रमाणे हवेत विरणार अशी चिन्हे दिसत असताना मागच्या आठवड्यात अनेक ठिकाणी मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येऊन आंदोलन करताना दिसले. त्यामुळे पुन्हा युतीची चर्चा सुरू झाली व स्वतः उद्धव यांनी महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, थोडे थांबा, असे सांगून नव्या समीकरणाची नांदी केली. मनसेसोबतच्या युतीबाबत मी संकेत नाही तर थेट बातमीच देईन, असे उद्धव म्हणाले. तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंमध्ये दूरध्वनीवर चर्चा सुरूही झाली असेल असे, सूचक वक्तव्य करून  येणार्‍या महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असेच सूचित केले.
 
जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या सेनेत गेलेल्या सुजाता शिंगाडे काल स्वगृही परतल्या. यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उद्धव यांना मनसेसोबतच्या युती प्रश्न विचारला. राज ठाकरे-उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार? या थेट प्रश्नाला उत्तर देताना उद्धव म्हणाले, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल. याबाबत अधिक विचारता, याबाबत जे बाकीचे बारकावे आहेत ते आम्ही पाहात आहोत. त्यामुळे संदेश, संकेत कशाला, मी थेट बातमीच देईन तुम्हाला, असे उत्तर उद्धव यांनी दिले. माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे कोणते नेते आमच्या एकमेकांच्या संपर्कात आहेत, त्यांच्याही मनात संभ्रम नाही. त्यामुळे आम्ही कोणताही संदेश देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती आम्ही देऊ, असे उद्धव म्हणाले.

मनसेची सावध प्रतिक्रिया

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत आत्तापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी मनसेच्या दुसर्‍या फळीतील नेते अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांनी सावध भूमिका घेतली. २०१४ आणि १७ मध्येही महाराष्ट्रातील लोकांच्या मनात हे होते, पण उद्धव यांच्या मनात नव्हते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेत गुंतवून शेवटी युती केली नाही. दूध पोळले असल्याने ताकही फुंकून पित आहोत. याबाबत पक्षांतर्गत कुठलीही चर्चा झाली नाही. जोवर कुठलाही ठाम प्रस्ताव राज ठाकरे यांच्यासमोर येत नाही, तोपर्यंत ते निर्णय घेऊच शकत नाहीत. प्रस्ताव आला की योग्य वेळी निर्णय होईल, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. २०१४ आणि २०१७  या दोन्ही घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यावेळी आमची युतीची भावना होती. बाळा नांदगावकर ‘मातोश्री’वर गेले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली. तर राजकीय युती प्रसार माध्यमांमध्ये बोलून होत नसते. त्यांची प्रामाणिक इच्छा असेल तर उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव पाठवावा, असे देशपांडे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे आले तर राज ठाकरे शंभर पावले पुढे येतील, असे सांगताना युती करायची असेल तर उद्धव ठाकरे यांना पुढाकार घ्यावा लागेल, असे अविनाश जाधव यांनी सूचित केले.
 

Related Articles