पावसामुळे अरुणाचल प्रदेशात पूरस्थिती गंभीर   

३३ हजारांहून अधिक जण प्रभावित

इटानगर : सततच्या पावसामुळे अरुणाचल प्रदेशातील पूरस्थिती गंभीर होत असून, गुरुवारी येथील २४ जिल्ह्यांमध्ये ३३ हजार नागरिक प्रभावित झाले आहेत, अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.यावर्षीच्या मान्सूनच्या पावसामुळे जमीन खचल्याने आणि पुरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण बेपत्ता झाले आहेत, या बेपत्त झालेल्यांचा शोध  सुरू आहे, असे राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरच्या (एसईओसी)  अहवालात म्हटले आहे.
 
या अहवालात म्हटले आहे, की विविध जिल्ह्यांतील २१४ गावांमधील ३३ हजार २०० लोकसंख्या पूर आणि जमीन खचल्यामुळे बाधित झाली आहे.  राज्यभरात एकूण ४८१ घरांचे नुकसान झाले आणि ४३२ जनावरे मृत्युमुखी पडल्याची नोंद आहे. जमीन खचल्याने आणि पूर संबंधित घटनांमध्ये पूर्व कामेंगमध्ये सात, लोअर सुबानसिरीमध्ये दोन आणि लोंगडिंग, लोहित आणि अंजाव जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
 
अधिकार्‍यांनी सांगितले, की मे महिन्यात लोंगडिंग जिल्ह्यात खराब हवामानात झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर जमीन खचल्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला. दुसर्‍या घटनेत भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला होता. नैसर्गिक आपत्तींमुळे इतर चार लोक जखमी झाले आहेत.

अनेक भागांचे नुकसान

चांगलांग हा राज्यातील सर्वात जास्त प्रभावित जिल्हा आहे, येथे सहा गावे पाण्याखाली गेली असून, दोन हजार २३१ लोक बेघर झाले आहेत. मियाओ उपविभागातील अनेक भाग पाण्याखाली गेले असून, पशुधन आणि पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. चेंजलँडमधील नोआ-देहिंग नदीजवळील झुप्रा आणि रिव्हर कॅफे सारखी लोकप्रिय पर्यटन स्थळे पुराच्या पाण्याने बुडाली आहेत. खरसांग परिसरातील बालिनॉन्ग येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) वसतिगृहे, कर्मचारी निवासस्थाने, पाण्याच्या टाक्या आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याचे संकट

इटानगर राजधानी क्षेत्रात जमीन खचल्यामुळे पोमा पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पाइपलाइनचे नुकसान झाले, ज्यामुळे राजधानीतील रहिवाशांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले. पाण्याचा पुरवठा पूर्ववत होण्यासाठी सुमारे १० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

बचाव कार्य सुरू 

आतापर्यंत एकूण दोन हजार २९२ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), राज्य पोलिस आणि स्वयंसेवकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

Related Articles