नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?   

अजय तिवारी 

अलीकडेच नक्षलवाद्यांच्या सर्वांत मोठ्या म्होरक्याला यमसदनी धाडून नक्षलवाद संपवण्याची आपली लढाई अंतिम दिशेने जात असल्याचे सरकारने स्पष्ट केले असले तरी समस्येच्या मुळाशी गेल्यासच नक्षलवादाचे पूर्ण उच्चाटन शक्य आहे.
 
छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलांनी अलिकडेच २७ माओवाद्यांचा खात्मा केला. बस्तर विभागातील नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत हे माओवादी मारले गेले. त्यात माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा सर्वोच्च म्होरक्या अ नंबला केशव राव उर्फ बसवराजू यांचा समावेश आहे, असे उत्स्फूर्तपणे म्हटले आणि या महत्त्वाच्या कारवाईचा अंदाज आला. ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ पूर्ण झाल्यानंतर छत्तीसगढ, तेलंगण आणि महाराष्ट्रात ५४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आणि ८४ नक्षलवादी शरण आले.
 
तथापि, नक्षलवादाचे  निरीक्षण करणारे काही तज्ज्ञ आणि पत्रकार नक्षलवाद संपला आहे असे घोषित करणे घाईचे होईल, असे म्हटले. गेल्या काही वर्षांमध्ये सुरक्षा दलांना नक्षलवाद्यांविरोधी कारवायांमध्ये सलग यश मिळाले आहे; पण त्यांना नुकसानही सहन करावे लागले आहे. त्याच वेळी सुरक्षा दलांच्या काही कृतींबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. छत्तीसगढमध्ये माओवादी हिंसाचाराच्या घटना वाढल्या; पण मृतांची संख्या कमी झाली. 
 
सरकारी आकडेवारीनुसार २०२५ मध्ये मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या १८० पेक्षा जास्त झाली आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये सुरक्षा दलांनी बस्तर आणि आसपासच्या भागात ५६ नक्षलवाद्यांना संपवल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या कारवाईत  गेल्या १५ महिन्यांमध्ये छत्तीसगढमध्ये   ४०० हून अधिक संशयित नक्षलवादी मारले गेल्याचा दावा केला आहे.  करेगुट्टालूच्या टेकड्या, दर्‍या आणि गुहांमध्ये मोठ्या संख्येने नक्षलेवादी लपले असल्याची माहिती   केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतरच्या कारवाईत ३१ माओवाद्यांच्या मृत्यूच्या दाव्यासोबतच सुरक्षा दलांनी माओवादविरोधी कारवाईत  नक्षलवाद्यांची एकूण २१४ लपण्याची ठिकाणे आणि बंकर नष्ट करण्यात आल्याचा दावा केला. या कारवाईदरम्यान  मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली.नक्षलविरोधी कारवायांची तीव्रता आणि त्याच्याशी संबंधित सध्याच्या आकडेवारीवरून नक्षलवादी चळवळ १९७० नंतरच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात असल्याचे दिसून येत आहे.
 
२०२० ते २०२३ या चार वर्षांमध्ये छत्तीसगढमध्ये १४१ माओवादी मारले गेले. भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये राज्याचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी माओवाद्यांशी शांतता चर्चेचा प्रस्ताव ठेवला.  दुसरीकडे राज्यातील सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्धची कारवाई हळूहळू तीव्र केली. दरम्यान, शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांना संपवण्याची घोषणा केली. त्यानंतर  कारवायांमध्ये  गती आली. छत्तीसगढमध्ये २०२४ या एका वर्षात २८७ नक्षलवादी मारले गेले, एक हजारजणांना अटक करण्यात आली आणि ८३७ जण शरण आले. बस्तर परिसरात सुरक्षा दलांच्या २८ छावण्या उघडण्यात आल्या. येथे नक्षलवादविरोधी कारवायांचा वेग कायम आहे. या काळात, राज्यात विविध सार्वजनिक संघटनांमधील लोकांना मोठ्या संख्येने अटक करण्यात आली. निष्पाप आदिवासींच्या छळाच्या बातम्याही समोर आल्या आणि अनेक चकमकींवर प्रश्न उपस्थित केले गेले; पण यामुळे कारवाईत कोणताही फरक पडला नाही. 
 
अलिकडच्या काळात बनावट चकमकीचे सर्वात चर्चेत असलेले प्रकरण २०२२ मध्ये समोर आले. जानेवारी २०२२ मध्ये छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी २६ वर्षीय मनुराम नुरेती याला नक्षलेवादी ठरवून ठार मारले. घटनेच्या एका आठवड्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी मान्य केले की मनुराम प्रत्यक्षात माओवादी नव्हता.नक्षलवादविरोधी कारवाईमध्ये सुरक्षा दलांचेही मोठे नुकसान झाले. जानेवारी २०२५ मध्ये छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी पेरलेल्या ‘आयईडी’च्या स्फोटात आठ सुरक्षा कर्मचारी आणि एक नागरिक ठार झाला. मृतांच्या संख्येच्या बाबतीत एप्रिल २०२३ नंतरचा हा पहिलाच मोठा ‘आयईडी’ स्फोट होता. दंतेवाडा येथे अशाच प्रकारच्या स्फोटात ‘डीआरजी’चे दहा कर्मचारी आणि एक नागरिक च ठार झाला होता.
 
सध्या नक्षलवादी संघटना निश्चितच कमकुवत झाली आहे. त्यांचे अनेक वरिष्ठ म्होरके मारले गेले आहेत आणि सुरक्षा दलांनी त्यांच्या प्रभावाचे अनेक भाग ताब्यात घेतले आहेत; परंतु नक्षलवाद शेवटच्या टप्प्यात आहे असे म्हणणे तपासून पहावे लागेल. बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचीही एक रचना आहे, एक निश्चित व्यवस्था आहे. त्यात एकाचे निघून जाणे दुसर्‍यासाठी जागा निर्माण करते. सरकारच्या मते एप्रिल २०१८ मध्ये देशभरातील नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या १२६ वरून ९० वर आली. जुलै २०२१ मध्ये अशा जिल्ह्यांची संख्या ७० पर्यंत होती तर एप्रिल २०२४ च्या आकडेवारीनुसार नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या फक्त ३८ वर आली.
 
मे १९९२ मध्ये सर्वात मोठ्या माओवादी संघटनेत सीपीआय (एमएल) पीपल्स वॉर ग्रुपमधील वादांची तीव्रता वाढत होती. आंध्र प्रदेशामध्ये संघटनेवर बंदी घालून एक आठवडाही झाला नव्हता; पण संघटनेचा केंद्रीय समिती सचिव कोंडापल्ली सीतारामय्या त्याच्या सहकार्‍यांसह वेगळी संघटना स्थापन करण्याच्या मनस्थितीत आला होता. १९८० च्या दशकात वारंगल विद्यापीठातून बी.टेक पूर्ण केल्यानंतर संघटनेत सामील झालेला नंबला केशव राव याने सीतारामय्या याच्यासोबत जाण्याऐवजी ‘पीपल्स वॉर ग्रुप’मध्ये राहणे पसंत केले. जून १९९२ मध्ये मुप्पल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती याला सरचिटणीस बनवण्यात आले, तेव्हा नंबला केशव राव त्याचा जवळचा सहकारी झाला. नंबल्ला केशव राव याला पक्षाच्या केंद्रीय समितीमध्ये स्थान देण्यात आले.
 
तोच ७० वर्षीय नंबला केशव राव नक्षलवादी चळवळीत बसवराजू म्हणून ओळखला जात होता. छत्तीसगढमधील नारायणपूर येथे झालेल्या चकमकीत पोलिसांनी २७ माओवाद्यांसह  बसवराजूला ठार मारले. या घटनेकडे अनेक लोक सशस्त्र माओवादी संघर्षाच्या समाप्तीची सुरुवात म्हणूनही पाहत आहेत. केशव राव याची हत्या किती महत्त्वाची आहे, याचा अंदाज यावरून येतो की त्याची अधिकृत घोषणा बस्तरच्या कोणत्याही पोलिस अधिकार्‍याने किंवा राज्याच्या गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी केली नाही. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी ‘सोशल मीडिया’वर पोस्ट करून केशव रावच्या हत्येची अधिकृत माहिती दिली. 
 
हैदराबादपासून सुमारे ७२० किलोमीटर अंतरावरील एका छोट्या गावातील शिक्षक वासुदेव राव याचा नंबला केशव राव हा मुलगा. तो एक हुशार विद्यार्थी होता. त्याने वारंगल येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सहा फूट उंचीच्या केशव रावने व्हॉलीबॉल आणि कबड्डी खेळाडू म्हणून स्वतःची खास ओळख निर्माण केली होती. शिकत असतानाच केशव राव ‘रॅडिकल स्टुडंट्स युनियन’मध्ये सामील झाला. त्याच्याविरोधात पोलिसात काही गुन्हेही दाखल झाले. केशवने एम.टेक. साठी प्रवेश घेतला, पण त्याचा बहुतेक वेळ राजकीय कार्यात जाऊ लागला. त्याने ‘सीपीआय लिबरेशन’साठी काम करायला सुरुवात केली. 
 
शिक्षण घेत असताना त्याने ‘सीपीआय पीपल्स वॉर ग्रुप’साठी काम करण्यास सुरुवात केली. एकामागून एक जबाबदार्‍या स्वीकारत त्याने संघटनेतील नेतृत्वाचा विश्वास जिंकला. प्रत्येक जबाबदारी आणि क्षेत्रासोबत केशव रावचे नाव बदलत राहिले. १९९२ मध्ये ‘पीपल्स वॉर ग्रुप’ कोसळण्याच्या मार्गावर असताना गणपतीसोबत राहिलेल्या केशवला केंद्रीय समितीचा सदस्य म्हणून जबाबदारी मिळाली. सरचिटणीस असलेल्या केशवची हत्या झाल्याने नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला. त्यामुळे ही चळवळच मोडीत निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles