नीट परीक्षा होणार एकाच सत्रात   

नवी दिल्ली : वैदकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट-पीजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. नीट-पीजी परीक्षा एकाच सत्रात घ्या. त्यामुळे पारदर्शकता राहील आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयामुळे देशातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा १५ जून रोजी एकाच सत्रात पार पडणार आहे. 
 
नीट-पीजी परीक्षा दोन सत्रात घेण्यासंदर्भात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावत एकाच सत्रात परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांचा समावेश होता.
 
दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेच्या स्तरात भिन्नता निर्माण होऊ शकते. ज्यामुळे असमानता आणि मनमानीची शक्यता वाढते, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदविले. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिका अचूकपणे एकसमान कठीणतेच्या असतील, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांसाठी समान निकष आणि संधी सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा एकाच सत्रात घेणे आवश्यक आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, नीट-पीजी २०२५ परीक्षेसाठी आवश्यक तयारी करण्यासाठी वेळ उपलब्ध आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. परीक्षेसाठी केंद्र निश्चित करण्यासाठी परीक्षा मंडळाकडे पुरेसा वेळ आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. तसेच, परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

Related Articles