पाकिस्तान सुपर लीग दुसर्‍या देशात हलवली   

इस्लामाबाद : भारताने काल पाकिस्तानमधील रावळपिंडी मैदानाजवळ ड्रोनने हल्ला केला होता. सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग सुरु आहे. काल रावळपिंडी मैदानावर पाकिस्तान सुपर लीगचा सामना खेळवण्यात येणार होता. भारताने प्रतिहल्ला करत रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त केले होते. यामुळे ८ मे रोजी कराची किंग्स आणि पेशावर जाल्मी यांच्यात होणारा सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता पाकिस्तानने पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरीत सामने युएईला (दुबई) हलवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
पाकिस्तान सुपर लीगचे आणखी ८ सामने अद्याप शिल्लक आहे. रावळपिंडी, मुलतान आणि लाहोरमध्ये उर्वरित सामने खेळवण्यात येणार होते. मात्र भारताच्या ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानने सुपर लीगचे सर्व सामने युएईला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील साखळीचे चार सामने आणि क्वालिफायर, इलिमेनंटर आणि अंतिम सामना बाकी आहे. हे सर्व सामने आता युएईला खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, पाकिस्तानचा दहशतवाद आणि त्यांची रणनिती पाहून पीएसएल खेळणारे विदेशी खेळाडू घाबरले आहेत. अशा स्थितीत मायदेशी परतण्याचा निर्णय अनेक खेळाडूंनी घेतला आहे. 
 
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने एक्स अकाउंटद्वारे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती दिली. या लष्कराच्या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले आहेत. भारतीय सैन्याच्या या कारवाईने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीर खोर्‍यातील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये भारतातील २६ निष्पाप लोक मारले गेले.
 
जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला.  पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे.  भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर येत आहे.

Related Articles