आपत्ती व्यवस्थापनाच्या कामातील अडथळे होणार दूर   

महापालिकेला विशेष अधिकार

पुणे : गेल्या वर्षी पावसाळ्यात पुणे शहरात पावसाने कहर केला होता. शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच विविध ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. पुणे महापालिकेने पावसाळी पूर्वी केलेली कामे व्यवस्थित केली नव्हती. त्यामुळे हा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे यंदा पालिकेकडून पावसाळी पूर्वी कामे करताना तसेच आपत्तीजनक परिस्थिती ओढावणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. ही कामे करताना कोणतेही अडथळे अथवा विरोध झाला तर अर्बन डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी (युडीएमए) ने पालिकेला थेट कारवाईचे आदेश दिले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी दिली.
 
पावसाळी पूर्वी कामांबाबत मंगळवारी पालिकेत बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनाबाबत कामे करताना अनेक वेळा पालिकेला अडथळ्यांचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षी ड्रेनेज लाईनमध्ये ऑप्टीकल फायबर केबल्स टाकल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या. आताही पुणे मेट्रोने पालिकेला अनेक डक मध्ये कबल असल्याबाबतची माहिती दिली आहे. या केबल्स काढून टाकण्यासाठी संबंधित कंपन्यांना तीन दिवसांची वेळ देण्यात आली आहे. जर तीन दिवसात कार्यवाही झाली नाही, तर पालिकेला युडीएमएने दिलेल्या आधिकारानुसार थेट कारवाई करणार आहे. असे पृथ्वीराज यांनी सांगितले.
 
शहरातील विविध ठिकाणी पाणी साचणार्‍या ठिकाणांवर उपाय योजनांची कामे हाती घेतली आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाच संरक्षण विभागाच्या हद्दीतील पावसाळी पाणी कोणत्याही उपाय योजना न करता पालिकेच्या हद्दीत सोडण्यात आले आहे. या पाण्याचा प्रवाह पावसाळ्यात वाढतो. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. अशी परिस्थिती यंदा उद्भवू नये, यासाठी संरक्षण विभागाकडे त्यांच्या हद्दीत काम करण्यास परवानगी देण्याची मागणी पालिका प्रशासनाने मागण्यात आली आहे. त्यानुसार संरक्षण विभागाने १२ ठिकाणी काम करण्याची परवानगी दिली आहे. तर ९ ठिकाणी तात्काळ काम सुरु केले जाणार आहे.  
 
दरम्यान, पावसाळ्यात शहरात मागील वर्षी सुमारे २०१ ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे पूरस्थिती उद्भवली होती. त्यामध्ये, संरक्षण विभागाच्या हद्दीतील येरवड्यातील आंबेडकर सोसायटीतून बीईजीच्या परिसरात जाणार्‍या नाल्याचा प्रवाह बंद केल्याने पावसाचे पाणी घरात शिरण्याची समस्या, धानोरीतील लक्ष्मीनगर सोसायटीत संरक्षण विभाग ग्रेफ सेंटर परिसरातील चर्‍होली डोंगरावरून पाणी येत असल्याने वाहतूक आणि व्यवसायिकांचे होणार नुकसान होते. तसेच, पाषाणमधील आयआयएसईआर आणि एनसीएल परिसरातून बाणेर रस्त्यावर साचणारे पाणी या समस्या सोडविण्यासाठी काम करणे गरजेचे असल्याचे महापालिकेकडून संरक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
 
पालिकेकडून संबंधित नाल्यांचे रुंदीकरण,सफाई, पावसाचे पाणी साठवण्यासाठी नवीन तलाव व चेंबर उभारणे, तसेच आवश्यक ठिकाणी नवीन नाल्यांची योजना करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून संरक्षण विभागास सांगण्यात आले आहे. मात्र, ती हद्द संरक्षण विभागाची असल्याचे ही कामे करण्यासाठी त्यांची परवानगी अनिवार्य असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. तसेच,पावसाळ्यापूर्वी ही कामे झाल्यास या ठिकाणची पूरस्थिती रोखण्यास आहे. 
 
आपत्ती व्यवस्थापनाची कामे करताना कोणी विरोध अथवा कोणताही अडथळा निर्माण झाल्यास संबंधितांवर थेट कारवाई करण्याचे अधिकारी जिल्हाधिकार्‍यांना   युडीएमएने दिलेले आहेत. आता हे अधिकार पालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची कामे करताना विरोध अथवा अडथळा आल्यास थेट कारवाई केली जाईल. झाडांच्या फांद्या तोडण्यास विरोध होत असेल तर या अधिकारात हे काम पूर्ण केले जाईल.
 
 - पृथ्वीराज बी पी, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका  
 

Related Articles