वादग्रस्त खटल्याची पुढील सुनावणी ९ मे रोजी   

पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणात सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी दिलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी, सत्यता, कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी ठराविक कालावधी लागणार आहे. तोपर्यंत खटल्याची सुनावणी तहकूब करण्यात यावी, असा राहुल गांधी यांच्या वकिलांनी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर करीत खटल्याची सुनावणी तहकूब केली. आता या खटल्याची पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे.
  
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी एमपी एमएलएच्या विशेष न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. हा खटला दाखल करताना सावरकर यांनी लिहिलेले ’माझी जन्मठेप’ हे पुस्तक तसेच, एक पेन ड्राईव्ह व काही वर्तमानपत्रांची कात्रणे न्यायालयात दाखल केली. मात्र, या कागदपत्रांच्या प्रती बचाव पक्षाला मिळाल्या नाहीत. ही सर्व कागदपत्रे व माझी जन्मठेप हे पुस्तक बचाव पक्षाला देण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, असा अर्ज राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी मागील सुनावणी दरम्यान केला होता. त्यानुसार फिर्यादी यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, पेन ड्राईव्ह व माझी जन्मठेप हे पुस्तक वकील पवार यांना द्यावेत, असा आदेश देखील विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी दिला होता. शुक्रवारी (ता.२५) झालेल्या सुनावणीत फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोलाटकर यांनी वरील सर्व कागदपत्रे, माझी जन्मठेप हे पुस्तक पुणे न्यायालयात वकील मिलिंद द. पवार यांना हस्तांतरित केले.
  
सर्व दिलेल्या कागदपत्रांची सत्यता व पडताळणी केल्याशिवाय खटला पुढे जाऊ शकणार नाही. कारण, सर्व कागदपत्रे व पुस्तक वाचल्यानंतरच त्यातली सत्यता स्पष्ट होईल. त्यानंतर खटल्याची सुनावणी नियमित घेता येईल. या सर्व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अधिकचा वेळ लागणार आहे. त्यामुळे न्यायालयाने वकील पवार यांनी केलेला अर्ज मंजूर करीत खटल्याची सुनावणी तहकूब केली. 

Related Articles