उमेदीवर पाणी   

प्रा.अशोक ढगे 

गेल्या सुमारे तीन आठवड्यामध्ये राज्यभरात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या उमेदीवर पाणी ओतलेे आहे. वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे सुमारे २२,८७९ हेक्टर क्षेत्रावर गंभीर परिणाम झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.. अशा वेळी शेतकर्‍यांना धीर देण्याची आवश्यकता आहे.
 
महाराष्ट्रात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस आता नियमित मान्सूनचा कालावधी जवळ आला असला, तरी थांबायला तयार नाही.मान्सूनपूर्व पावसाचा  राज्यातील २१ जिल्ह्यांमधील ८६ तालुक्यांना  फटका बसला असून अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात अमरावती जिल्हा सर्वाधिक बाधित झाला. या जिल्ह्यातील १०,६३६  हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. मूग, संत्रा, कांदा, ज्वारी आणि केळी पिके प्रभावित झाली आहेत. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात ४,३९६ हेक्टर क्षेत्रावर मका, बाजरी, कांदा, भाजीपाला आदींचे नुकसान झाले. नाशिक (१,७३४ हेक्टर), जालना (१,६९५ हेक्टर) आणि चंद्रपूर (१,०३८ हेक्टर) जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पालघर (७९६ हेक्टर), धुळे (६४५), गडचिरोली (३४२), वाशिम (२०३), बुलडाणा (१८१), यवतमाळ (१७८), गोंदिया (१४३), भंडारा (७५), नागपूर (४२), परभणी (४१), नंदुरबार (२८), रायगड (१७), पुणे (५) आणि ठाणे (एक) हेक्टर हे इतर बाधित जिल्हे आहेत. 
 
पहिल्या अवकाळी पावसाचे पंचनामे होत नाहीत, तोच दुसरा अवकाळी पाऊस पडतो आणि नुकसानीचे आकडे वाढतात. जालना, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये प्रचंड फटका बसला आहे. अमरावतीतील अचलपूर, चांदूरबाजार, चिखलदरा हे तालुके विशेषतः बाधित झाले आहेत. नाशिकमधील सिन्नर, निफाड, मालेगाव, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर; जळगावमधील चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर; तर जालनामधील अंबड, मंठा, परतूर या तालुक्यांतील शेतकर्‍यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. 
 
फळपिकांमध्ये आंबा, संत्रा, पपई, केळी यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच भात, मका, बाजरी, कांदा, मूग, उडीद, भुईमूग आणि भाजीपाला यासारख्या पिकांनाही फटका बसला आहे. नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू असून अहवाल आल्यानंतर सरकारी धोरणानुसार नुकसानभरपाई देण्यात येईल, असे  मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले असले, तरी शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले असून सरकारनेतात्काळ मदतीची पावले उचलणे अत्यावश्यक आहे. अवकाळी पावसाने काही जिल्ह्यांमध्ये मूग, उडीद, भुईमूग यांसारख्या कडधान्य पिकांचीही हानी झाली आहे.
 
मुसळधार पाऊस आणि वादळाने प्रभावित जिल्ह्यांमध्ये  नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती  संभाजीनगर , जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, धुळे, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ यांचा समावेश आहे. भारतीय हवामान विभागाने प्रभावित जिल्ह्यांमध्ये ४० ते ६० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. वादळामुळे होणार्‍या संभाव्य व्यत्ययांचा इशारा दिला होता. या काळात राज्यातील नागरिकांना दक्ष राहण्याचा आणि आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.  पुणे, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि जोरदार वार्‍यासह पाऊस झाला. जामखेड तालुक्यात खर्डा, जवळा व नान्नज परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. 
 
सध्या शासकीय यंत्रणांकडून शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे केले जात आहेत. त्यामुळे अंतिमत: नुकसानीची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही तालुक्यात गारपीटदेखील झाल्याने नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. राज्यात सात दिवसांपासूनच्या पावसामुळे कांदा रोपे, आंबा, डाळिंब, टोमॅटो, गहू, मका, कांदा रोपवाटिका, अंतिम टप्प्यातील द्राक्षे तसेच भाजीपाला आणि अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील ३०० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुककसानग्रस्त भागाची पाहणी करत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. पण दररोजच्या पावसामुळे पंचनाम्यांसाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्वी झालेल्या पावसाने राज्यभरात हाहाकार माजवला. उन्हाळी हंगामातील पिके उद्ध्वस्त झाली. शेतकरी कोसळून पडला. पावसाळ्याइतका सर्वदूर आणि जास्त पाऊस झाल्याने हंगामात पावसाने दगा देऊ नये, अशी भीती व्यक्त केली जात आहे.  मराठवाड्यात फेब्रुवारीमध्येच उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. मार्चमध्ये पारा चांगलाच चढला. विदर्भात अकोला, चंद्रपूरमध्ये पारा ४३ ते ४५ अंशांपर्यंत गेला. त्यानंतरचे दोन महिने जादा तपमानाचे असतील, असा अंदाज होता; परंतु एप्रिलची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. विदर्भच नाही, तर मुंबई, कोकणातही एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाकडून आज आकाश निरभ्र राहील, असा अंदाज वर्तवला जातो आणि दिवसभर ढगाळ वातावरण राहते. संध्याकाळी, रात्री अवकाळी पाऊस कोसळतो. यामुळे सध्या महाराष्ट्राला ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे.  गेल्या दीड महिन्यापासून राज्यात नियमित मॉन्सूनसारखा पाऊस पडतो आहे. 
 
ज्या विदर्भात पारा ४५ अंशावर पोहोचला होता, तिथेच सर्वाधिक पाऊस कोसळला.  शेतजमिनीमध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बाष्पीभवनाच्या स्तरांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन वातावरणामध्ये भोवरे तयार होतात आणि त्यामध्ये बाष्प अडकते. वेगवेगळ्या ठिकाणचे कमी जास्त तपमान आणि हवेचा दाब यामुळे वारे वाहू लागतात. बाष्पीभवन एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यामुळे ऊर्ध्व दिशेने, पाणी धारण करणारा; पण पसरट ढग तयार होऊन पाऊस पडतो. महाराष्ट्रात आपण सात जून ते ३० सप्टेंबर असे चार महिने अधिकृत पावसाळा धरायचो; पण मान्सून पॅटर्न बदलल्यामुळे चक्रीवादळ, गारपीट, ढगफुटी यांच्याही अनियमित बदलामुळे मराठवाडा हा ढगफुटीचा प्रदेश बनला की काय, अशी शंका येते. 
 
गेल्या पाच-दहा वर्षांपासून हवामान बदलामुळे उन्हाळ्यातही तपमान कधी कमी तर कधी जास्त असते. काही वेळा गारपीट, मुसळधार पाऊस यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. पारंपरिक पिके नुकसान सहन करत नाही; मात्र दूरदृष्टीने शेती केल्यास अशा अचानक आलेल्या संकटावर शेतकरी नक्कीच मात करू शकतो. या परिस्थितीत बटाटे, बीट, गाजर आदी पिके घेतल्यास नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. काही शेतकरी मल्चिंग करतात. शेडनेट, पॉलिहाऊस उभारतात. यामुळे गारपीट तसेच अतिवृष्टी आणि त्यांचा परिणाम सुमारे एक महिन्यापर्यंत संभाव्य नुकसान टाळू शकतो. हवामानबदलाचा धोका लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी पिकांची लागवड करायला हवी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री तसेच जालना जिल्ह्यात तुतीचे क्षेत्र वाढत आहे. रेशीम शेती, बांबू, तीळ, कर्‍हाळा, ओवा, जवस हेसुद्धा बदलत्या हवामानात पर्याय ठरु शकते. पारंपारिक पिकांशिवाय बदलत्या हवामानामध्ये बळी न पडणार्‍या पिकांचा अवलंब शेतकर्‍यांनी सध्या केला पाहिजे.

Related Articles