पेच मिटला, संघर्ष कायम   

राज्यरंग :श्रीनिवास राव

कर्नाटकामध्ये काँग्रेस सत्तेत येऊन दोन वर्षे झाली असताना नेतृत्वबदलाच्या मागणीने जोर धरला होता. येथे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा गट अडीच वर्षांच्या तडजोडीकडे लक्ष वेधत आहे. पण पक्ष सिद्धरामय्या यांना बदलणार नाही. यामुळे पक्षांतर्गत संघर्ष निर्माण राहून मध्य प्रदेश किंवा राजस्तानसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.कर्नाटकातील  सिद्धरामय्या सरकारमध्ये सर्व काही ‘आलबेल’ नाही. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या गटांनी सत्ता बदलाचे दावे करण्यास सुरुवात केली होती. याशिवाय, काहींनी सरकारवर  भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत,  तर काहींनी विकासावरून आरोप केले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत राजकीय संघर्ष जनतेसमोर आला आहे. 
 
काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी बेंगळुरूला येऊन आमदार आणि नेत्यांनी व्यक्तिशः चर्चा केली. त्यांनी ही बैठक नेतृत्वबदलासाठी नसल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात ते कशासाठी आले होते, हे सर्वज्ञात आहे. त्यांचे निरीक्षण काय आहे आणि पक्षात काय केले पाहिजे, याचा अहवाल ते पक्षश्रेष्ठांना देतीलच; परंतु सरकारमधील राजकीय गोंधळ त्यांना कितपत समजला असेल, याबद्दल शंकाच आहे. त्याचे कारण त्यांनीही नेतृत्वबदल होणार नसल्याचे सांगितले आहे. बडे नेते  राज्यांत आले, की नेते ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ करतात आणि त्यांची पाठ वळली, की ‘धरू एकमेकांचा गळा’ असे त्यांचे वागणे असते. 
 
सुरजेवाला यांना कर्नाटकात का यावे लागले, याचे चिंतन केले, तर त्यामागचे खरे कारण लक्षात येते. गेल्या एका आठवड्यात अशी अनेक विधाने समोर आली आहेत, ज्यामुळे काँग्रेस सरकारच्याच अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. एकीकडे आमदार बी.आर. पाटील यांनी गृहनिर्माण विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला , तर आमदार राजू कागे यांनी ढासळणार्‍या प्रशासकीय व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला . काँग्रेसचे आमदार इक्बाल हुसेन यांनी सत्ता परिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला होता. एका निवेदनात त्यांनी म्हटले होते, की  सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे. इक्बाल हे डी. के. शिवकुमार यांचे समर्थक असल्याने, त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची धडपड त्यांनी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठांसमोर अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली होती. त्यामुळे आता डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे, अशी आठवण त्यांनी पक्षश्रेष्ठांना करून दिली होती; पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे समर्थक अशा कोणत्याही फॉर्म्युल्याला स्वीकारण्यास नकार देत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलाला विश्वास आहे, की त्यांचे वडील पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील.
 
नेतृत्व बदलाबाबत कर्नाटकातील काँग्रेसमध्ये सुरू असलेली सुंदोपसुंदी आणि परस्परविरोधी विधानांनी पक्षश्रेष्ठ नाराज झाले . त्यामुळे त्यांनी सुरजेवाला यांना बेंगळुरूला पाठवले.  अशा सर्व नेत्यांना सुरजेवाला यांच्या माध्यमातून इशारा देण्यात आल्याचे समजते. सार्वजनिक ठिकाणी अशी विधाने करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. सुरजेवाला काही नेत्यांशी खासगीतही चर्चा केली. आमदारांना भेटण्याचा त्यांचा निर्णय पक्षश्रेष्ठांनी सिद्धरामय्या मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल किंवा अगदी नेतृत्व बदलाबद्दल आमदारांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणून  पाहिला. तथापि, काँग्रेसच्या वरिष्ष्ठ नेत्यांनी राज्यात नेतृत्व बदलाची शक्यता फेटाळून लावली आहे. सिद्धरामय्या या वर्षाच्या अखेरीस शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवतील, अशा अटकळींना पूर्णविराम मिळाला आहे.
 
शिवकुमार गटातील लोक गेल्या काही काळापासून दोघांमध्ये अडीच वर्षांचा कार्यकाळ वाटपाचा फॉर्म्युला अंमलात येण्याची शक्यता वर्तवत आहेत. सिद्धरामय्या गटाने अशा कोणत्याही कराराचे अस्तित्व नाकारले आहे. उलट, शिवकुमार यांच्या दोन पदे भूषवण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. पक्षाच्या सूत्रांनी असेही सूचित केले आहे,  सिद्धरामय्या हे काँग्रेसचे एकमेव मागासवर्गीय मुख्यमंत्री आहेत. पक्षाने  अलीकडेच पक्षाच्या सुमारे दोन डझन वरिष्ठ मागासवर्गीय नेत्यांचा समावेश असलेली ओबीसी सल्लागार परिषद स्थापन केली आहे. परिषदेची पहिली बैठक १५ जुलै रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे.अशा पार्श्वभूमीवर एका मागास वर्गीय नेत्याला पक्षश्रेष्ठ कसे हटवू शकतात, असा सवाल केला जातो.
 
सुरजेवाला यांच्या भेटीचा उद्देश नेतृत्वातील एका गटात निर्माण झालेली निराशा दूर करणे हा होता असे सांगितलेजात आहे.निधी वाटपाबाबत एक-दोन आमदारांनी उघडपणे आपली निराशा व्यक्त केली. शिवाय, पक्ष आणि सरकारमध्ये नेतृत्व बदलाबाबत बरीच विधाने केली जात आहेत. आम्ही त्यांना दिल्लीला बोलावून सार्वजनिक ठिकाणी अशी विधाने करण्यापासून परावृत्त करण्यास सांगण्याचा विचार केला; परंतु आम्हाला वाटले, की प्रभारी सरचिटणीसांनी तिथे जाऊन सर्व स्तरावरील नेत्यांना भेटणे, त्यांच्या चिंता समजून घेणे आणि संघटनात्मक आणि प्रशासनविषयक बाबी सार्वजनिक न करण्यास सांगणे चांगले होईल, असे एका केंद्रीय नेत्याने सांगितले.
 
एकीकडे असे सांगितले जात असले, तरी दुसरीकडे मात्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानांमुळे संमिश्र संकेत मिळाले होते. ते म्हणाले होते, ‘‘हे ‘हायकमांड’च्या हातात आहे. ‘हायकमांड’मध्ये काय चालले आहे हे कोणीही सांगू शकत नाही. ‘हायकमांड’ला पुढील कारवाई करण्याचा अधिकार आहे; परंतु कोणीही अनावश्यक समस्या निर्माण करू नये,’’ राज्यातील काही काँग्रेस नेत्यांनी ऑक्टोबरमध्ये नेतृत्व बदलाच्या दाव्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. सुरजेवाला यांच्या भेटीबद्दल विचारले असता, खर्गे म्हणाले, की सुरजेवाला आले आहेत. त्यांच्या अहवालाच्या आधारे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे, आम्ही कोणती पावले उचलायची हे ठरवू. आता खर्गे यांच्या विधानाचा वेगवेगळा अर्थ लावला जात आहे,.
 
सप्टेंबरनंतर ‘क्रांतिकारी’ राजकीय घडामोडींचे संकेत देणार्‍या सहकार मंत्री के. एन. राजन्ना यांच्या वक्तव्यानंतर बदलांबाबतच्या अटकळांना पुन्हा उधाण आले होते. अशा वेळी सुरजेवाला यांची भेट झाली . सिद्धरामय्या यांचे जवळचे सहकारी राजन्ना यांनी असेही संकेत दिले होते, की सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोली हे शिवकुमार यांच्या जागी पुढील प्रदेशाध्यक्ष असतील. पक्षाच्या वर्तुळात मंत्रिमंडळात फेरबदलाचीही चर्चा आहे.  आमदार एचए इकबाल हुसेन यांनी दावा केला होता, की शिवकुमार यांना पुढील दोन ते तीन महिन्यांत मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते. हे सरकार सत्तेत येण्यापूर्वी आमच्या (काँग्रेस) ताकदीची तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हा विजय मिळविण्यासाठी कोणी संघर्ष, घाम, प्रयत्न आणि रस दाखवला हे सर्वांना माहिती आहे. 
 
सिद्धरामय्या यांनी पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री राहू, असे ठामपणे सांगितले. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांचे हातात हात घालून ते उंचावतानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री राहतील, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, असे सांगितले; परंतु त्यांचे त्यापुढचे वाक्य जास्त महत्त्वाचे आहे. पक्षश्रेष्ठांचा निर्णय असेल, तर मी  माझ्यापुढे काय पर्याय आहेत, अशी उलट विचारणा त्यांनी केली. मागे त्यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात घेतलेली भूमिका आणि शिवकुमार आणि शशी थरूर यांच्या भाजपच्या प्रवेशाच्या चर्चा पाहता ही वादळापूर्वीची शांतता आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. 

Related Articles