एक ‘खास’ विजय   

मिडविकेट : कौस्तुभ चाटे 

शुभमन गिलने आकाशदीप च्या गोलंदाजीवर ब्रायडन कार्सचा झेल घेतला आणि एकच जल्लोष उडाला. भारतीय संघाने बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवला होता. एजबेस्टनच्या  मैदानावर कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची भारताची ती पहिलीच वेळ. हा विजय खास आहे हे नक्की. मुळातच पहिली कसोटी हाताशी आली असताना आपण हरलो होतो, त्यात इंग्लिश वातावरणाला आपले बरेचसे खेळाडू अजूनही जुळवून घेत होते. हा संघ तसा नवीन आहे. रोहित-विराटची कमतरता नक्कीच जाणवत होती. कप्तान म्हणून गिल कशी कामगिरी करतो हे बघणे पण महत्त्वाचे होते. अशावेळी कप्तानासह सर्व खेळाडूंनी एकत्र येऊन विजय मिळवणे नक्कीच खास आहे. भारतीय संघाने तब्ब्ल ३३६ धावांनी विजय मिळवला. भारताबाहेर आपण मिळवलेल्या विजयांमध्ये हा सर्वात मोठा विजय ठरला. 
 
क्रिकेटमध्ये एक वाक्य आपण सतत ऐकतो, ते म्हणजे ’क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.’ ही कसोटी बघितलेला प्रत्येक क्रिकेट रसिक हेच म्हणत असेल. पहिल्या कसोटीत आपण ५ शतके करून देखील अपयशी ठरलो होतो ही गोष्ट नक्कीच त्रास देत होती. मुळात कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्ध्याचे २० बळी घेणे हे फलंदाजीपेक्षाही महत्त्वाचे आहे. आणि पहिल्या कसोटीत आपण तिथेच कमी पडलो. आपल्याकडे बुमरा तर होता, पण त्याला साथ द्यायला समोर कोणी दिसलाच नाही. नेमके त्याच्या उलट या कसोटीमध्ये घडले. इथे आपण बुमराला बाहेर ठेवले आणि आकाशदीपला खेळवले. जसप्रीत बुमरा वरील ताणाचा  विचार करून त्याला बाहेर ठेवले गेले होते. पण संधी मिळताच आकाशने त्याचे सोने केले. पहिल्या डावात ४ आणि दुसर्‍या डावात ६ बळी घेत त्याने इंग्लिश फलंदाजीला वेसण घातली. अर्थात त्याला चांगली साथ मिळाली ती महमद सिराजची. सिराजने पहिल्या डावात भेदक मारा केला आणि त्याला त्याचे फळ देखील मिळाले. या दोघांनी मिळून कसोटीत १७ इंग्लिश फलंदाज बाद केले. पहिल्या कसोटीत आकाशदीप देखील खेळला असता तर कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा लागला असता का? एरवी इंग्लिश खेळपट्ट्या आणि वातावरण गोलंदाजांना साथ देतात, पण यावर्षी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. दोन्ही संघ भरभरून फलंदाजी करत आहेत, आणि त्यामुळेच गोलंदाजांचा कस लागतो आहे. अशा परिस्थितीमध्ये सिराज आणि आकाशने केलेला मारा नक्कीच वेगळा आणि महत्त्वाचा ठरतो. सिराजने पहिल्या डावात बेन स्टोक्सचा घेतलेला बळी आणि आकाशने दुसर्‍या डावात जोरूट आणि हॅरी ब्रूकचे घेतलेले बळी खासच होते. गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे तयार होणारे वेगवान गोलंदाज आणि योग्य वेळी ते करत असलेला मारा या दोन्ही गोष्टी अगदी संग्रहात ठेवण्याजोग्या आहेत. या विजयाचे जितके श्रेय शुभमन गिलचे आहे, तितकेच सिराज आणि आकाश या दोघांचेही आहे. 
 
शुभमन गिलच्या या कसोटीतील खेळीची जितकी तारीफ करावी तितकी कमीच असेल. पहिली कसोटी हरल्यानंतर, कप्तान म्हणून दबाव असताना, तोच दबाव कसा झुगारून टाकावा याचे हे उत्तम उदाहरण. गिल खर्‍या अर्थाने नवीन, तरण्याताठ्या खेळाडूंचा कर्णधार शोभतो आहे. पहिल्या डावातील त्याने केलेल्या २६९ धावा कोणत्याही फलंदाजाला हेवा वाटाव्या अशाच आहेत. या खेळीत त्याने तब्ब्ल ३० चौकार मारले. इंग्लिश गोलंदाजीमध्ये अँडरसन आणि ब्रॉड नाहीत, खेळपट्टी फलंदाजीला साथ देणारी आहे हे कितीही खरे असले तरीपण इतक्या सहजतेने मोठी धावसंख्या उभारणे कोणत्याही फलंदाजासाठी भूषणावह आहे. पहिल्या डावातील खेळी कमी पडते की काय अशी शंका मनात येताच त्याने दुसर्‍या डावात देखील चांगले, मोठे शतक झळकावले. यावेळी तर त्याची फलंदाजी म्हणजे आक्रमकतेचे उत्तम उदाहरण होते. एका कसोटीत द्विशतक आणि शतक झळकावणार्‍या काही मोठ्या खेळाडूंच्या यादीत आता त्याचे नाव घेतले जाईल. नाही म्हणता खंत इतकीच की त्रिशतकाच्या बर्‍यापैकी जवळ जाऊन तो बाद झाला. अर्थात या मालिकेत त्याचा फॉर्म वेगळ्या उंचीवर आहे, त्यामुळे त्याने अजून काही चांगल्या खेळी केल्या तर नवल वाटायला नको. 
 
१९३० मध्ये सर डॉन ब्रॅडमन यांनी इंग्लंडमध्येच केलेला ९७४ धावांचा विक्रम कदाचित धोक्यात येऊ शकतो. गिलला इतर फलंदाजांची चांगली साथ लाभली. पहिल्या डावात जयस्वाल आणि जडेजा तर दुसर्‍या डावात राहुल, पंत आणि जडेजा कप्तानाबरोबर उभे राहिले. त्यांनी दिलेली साथ आणि मोक्याच्या क्षणी केलेल्या धावा कायम लक्षात राहतील. आता गरज आहे ती म्हणजे करुण नायरने आपला दर्जा सिद्ध करण्याची. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो खोर्‍याने धावा करून भारतीय संघात परत आला आहे. पहिल्या दोन्ही कसोटींमध्ये त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. आता जर त्याने धावा केल्या नाहीत तर कदाचित तो ’वन ग्रेट इनिंग वंडर’ म्हणून ओळखला जाऊ शकतो. त्याच्या बॅटमधून धावा होणे आवश्यक आहे. या कसोटीमध्ये आपले क्षेत्ररक्षण देखील चांगले झाले. आपण पहिल्या कसोटीत अनेक झेल सोडले होते, चेंडू आपल्या हातात विसावतच नव्हता. पण या कसोटीत जणू हाताला फेविकॉल लावल्याप्रमाणे आपण सगळे झेल टिपत होतो. हा सामना जिंकण्यामागे हे देखील एक मोठे कारण नक्कीच आहे. काही प्रमाणात नितीश रेड्डी आणि प्रसिद्ध कृष्णाचा अपवाद वगळला तर या कसोटीमध्ये आपण अप्रतिम खेळ केला. यावेळी आपले सगळेच खेळाडू वेगळ्या जोशात खेळताना दिसले. या मालिकेत अजून तीन कसोटी सामने बाकी आहेत. हाच जल्लोष अजून काही आठवडे आपल्याला ठेवता आला पाहिजे. अर्थात प्रत्येक सामना वेगळा, खेळपट्टी वेगळी, हवामान वेगळे आणि त्या त्या दिवसाचा खेळ देखील वेगळा. कदाचित म्हणूनच कसोटी क्रिकेट इतर दोन प्रकारांपेक्षा वेगळे ठरते.         
 
भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी सामन्यांना गेल्या काही वर्षांत वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. हे कसोटी सामने  रंगतदार तर होतातच, पण क्रिकेट रसिकांसाठी, खास करून इंग्लिश वातावरणात क्रिकेट बघण्याचा एक वेगळा अनुभव करून देतात. इंग्लिश क्रिकेटपटू खडूस आहे. आपल्या देशात कसोटी सामना हरणे त्याला आवडत नाही. ही मालिका एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. भारतीय संघाने देखील कात टाकली आहे. त्यामुळे समोर असणारे तीन कसोटी सामने खासच असतील यात वाद नाही. एजबेस्टनच्या या मैदानातील हा विजय खास आहे, आणि पुढील अनेक वर्षे या विजयाची चर्चा होत राहील. ही मालिका आता १-१ अशा बरोबरीत आहे, गरज आहे ती म्हणजे आपला खेळ उंचावण्याची. गिलच्या नेतृत्वाखालील संघ कुठेही कमी पडणार नाही आणि लवकरच आपल्याला एक ’खास’ मालिका विजय बघायला मिळेल अशी आशा करूया.  

Related Articles