वाचक लिहितात   

शेतकर्‍यांसाठी सरकारकडे निधी नाही!

थकीत कर्ज आणि निर्माण झालेल्या शेती प्रश्नांवर दाद न मिळाल्याने शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारला. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांवर व्यापारी बँकांची ७९३,७८९ कोटी, सहकारी बँकांची ३५,४५६ कोटी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांची ९००४ कोटी रुपयांची कर्जे आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी सर्वांत जास्त कर्जबाजारी आहेत. देशात शेतकर्‍यांना व्यापारी, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँकांनी एकत्रितपणे १२,१९,५१६ कोटी रुपयांची कर्जे वितरित केली. त्यांची परतफेड न झाल्याने थकीत कर्जांचा बोजा शेतकर्‍यांच्या डोक्यांवर अजूनही आहे. कर्जांची परतफेड करण्यासाठी शेतकी उत्पादनांची इतर साधने उपलब्ध होऊ न शकल्याने शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक राहात नाही. जनसामान्यांची पोटची भूक भागवण्यासाठी काबाडकष्ट करणार्‍या शेतकर्‍यांना आर्थिक मदत किंवा कर्जमाफी, सबसिडी देऊ न शकणार्‍या सरकारकडे आपली सरकारे स्थिर ठेवण्यासाठी आखलेल्या योजनांच्या पूर्तीसाठी पुरेसा निधी कसा उपलब्ध होतो याचे आश्चर्य वाटते. जे शेतकरी आपल्याला आपल्या कष्टांची किंमत दिली जाईल या खात्रीशीर भावनेने सरकार निवडून देतात, त्याच शेतकर्‍यांना कष्टाचा मोबदला, कर्जांची परतफेड, तयार शेतमालास वाजवी दर मिळणे अपेक्षित असताना कुठल्याच प्रकारची किंमत दिली जात नाही. यामुळे येणार्‍या नैराश्याने आत्महत्या केल्या जातात. त्यांना सरकारांशिवाय अन्य कोण जबाबदार असूच शकत नाही.

राजन पांजरी, जोगेश्वरी.

नवी समीकरणे?

मराठीच्या मुद्द्यावर आवाज उठवणारे पण गेल्या दोन दशकांपासून दूर गेलेले मनसेचे सर्वेसर्वा राज आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधु एकत्र कधी येणार? याची महाराष्ट्रातील तमाम मराठीजनांना आस लागून राहिली होती; पण हिंदी सक्ती विरोधात रान उठवणार्‍या या दोन्ही बंधूंना एकाच मंचावर पाहून आनंद झाला. हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतल्यानंतर हा विजय मेळावा घेण्यात आला. या दोन बंधुंमुळे महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची फेरमांडणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव

गिलचा धमाका

गेल्या मे महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधार म्हणून पंजाबच्या २५ वर्षीय शुभमन गिलला निवडण्यात आल्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात नेहमीप्रमाणेच टीकेचे सूर उमटले. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांच्या निवृत्तीमुळे भारतीय संघात नसणे. त्यामुळे इंग्लंड दौर्‍यात संघाचे पानिपत हे ठरलेलेच अशीच टीकाकारांची भाषा होती; पण भारताच्या या नव्या कसोटी कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडच्या धर्तीवर गेल्यावर कात टाकली आणि धावांचा असा काही पाऊस पाडायला सुरुवात केली की, टीकाकारांची बोलतीच बंद झाली. इंग्लंड दौर्‍यावर भारतीय संघाचे नेतृत्व करणार्‍या गिलने पदार्पणातच लीडस येथील पहिल्या कसोटीत १४७ धावा करून शतक झळकावले. नंतर एजबॅस्टन येथील दुसर्‍या कसोटीत पहिल्या डावात द्विशतक (२६९ धावा) आणि दुसर्‍या डावात शतक (१६१ धावा) करून स्वप्नवत कामगिरी केली आणि भारतीय क्रिकेट रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. गिलच्या धुवाधार खेळाने भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे हे नक्की!

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

विक्रमाशी बरोबरी 

एजबस्टन कसोटीत इंग्लंड विरुद्ध शुभमन गिलने पहिल्या डावात द्विशतक आणि दुसर्‍या डावात शतक केले व महान फलंदाज सुनील गावसकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. गिलने आपल्या फलंदाजीतून आक्रमक व संयमी खेळाचे प्रदर्शन केले. त्याने मारलेले स्ट्रेट ड्राइव्ह व स्विप शॉट अप्रतिम होते. या खेळीमुळे त्याने महान फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 

माधव ताटके, पुणे 

महिला क्रिकेटलाही प्रोत्साहन द्या! 

इंग्लंडमध्ये भारतीय पुरुष संघ कसोटी मालिका खेळत असल्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या कसोटी मालिकेकडे लागले आहे. क्रिकेटप्रेमी असो की, प्रसारमाध्यमे सर्वत्र याच मालिकेची चर्चा सुरू आहे. पुरुषांप्रमाणे भारतीय महिलांचा क्रिकेट संघही इंग्लंडच्या दौर्‍यावर आहे, हे कोणाच्या गावीही नाही. अनेकांना तर महिलांचा संघ इंग्लंड दौर्‍यावर आहे हे देखील माहीत नाही. भारतीय महिला इंग्लंडविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका खेळत असून पहिल्या दोन सामन्यात भारताने इंग्लड विरुद्ध विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी आहे. भारताची धडाकेबाज खेळाडू उपकर्णधार स्मृती मंधाना हीने दोन्ही सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या सामन्यात तर तिने धडाकेबाज शतक झळकावले. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांत शतक झळकावणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू बनली. स्मृती या दौर्‍यावर उत्तम कामगिरी करत आहे, केवळ तीच नाही तर महिला संघातील सर्वच खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत. पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणे महिलांच्या क्रिकेटलाही प्रोत्साहन दिले पाहिजे.

श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे.

 

Related Articles