‘बालभारती’ची नवीन इमारत लवकरच   

मुंबई : ‘बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाली आहे. त्यामुळे तातडीने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली.पुण्यातील बालभारती कार्यालयाची इमारत जुनी झाली असून नवीन इमारत बांधण्यासंदर्भात ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्यास डॉ. भोयर यांनी उत्तर दिले. या चर्चेत जगन्नाथ अभ्यंकर, विक्रम काळे, किशोर दराडे यांनी सहभाग घेतला.
 
डॉ. भोयर म्हणाले की, बालभारतीची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी झाली. पहिली ते बारावीपर्यंतच्या सरकारमान्य अभ्यासक्रमाची पुस्तके याच ठिकाणी छापली जातात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित केली जातात. सध्या अस्तित्वात असलेली इमारत जूनी झाली आहे. त्यामुळे ही इमारत नव्याने बांधण्यासाठी लवकरच नियामक मंडळापुढे प्रस्ताव मांडून मान्यता घेतली जाईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू केले जाईल.
 
‘एससीईआरटी’ आणि ‘एनसीईआरटी’ अभ्यासक्रमासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर डॉ. भोयर यांनी देताना स्पष्ट केले की, राज्य सरकारच्या धोरणानुसार स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रम तयार केला जाईल. तसेच, बालभारतीने तयार केलेल्या वर्कबुक्सचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
 

Related Articles