तेलंगणा स्फोटातील मृतांची संख्या ४२ वर   

हैदराबाद : तेलंगणा औषधनिर्माण कारखान्यातील स्फोटातील मृतांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. रविवारी रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर डीएनए चाचणीद्वारे एका मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. ८ जण अजूनही बेपत्ता आहेत. अपघातानंतर ६ दिवसांनीही शोध मोहीम सुरू आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, शनिवार आणि रविवारी अपघातस्थळावरून काही हाडे आणि जळालेले अवयव सापडले. त्यांची डीएनए चाचणी सुरू आहे. जर ते जुळले तर बेपत्ता लोकांची संख्या कमी होऊ शकते. ३० जून रोजी सकाळी सव्वाआठ ते साडेनऊच्या दरम्यान पासुमिलाराम औद्योगिक क्षेत्रातील सिगाची इंडस्ट्रीजमध्ये हा अपघात झाला. घटनेच्या वेळी कारखान्यात १५० लोक होते, स्फोट झाला त्या ठिकाणी ९० लोक उपस्थित होते. त्या दिवशी बचाव आणि वैद्यकीय पथकाने ३१ मृतदेह बाहेर काढले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये भरपाई जाहीर केली होती. कंपनीने मृतांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये, गंभीर जखमींना १० लाख रुपये आणि इतर जखमींना ५ लाख रुपये भरपाई जाहीर केली होती.
 
प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोट इतका जोरदार होता की तिथे काम करणारे कामगार सुमारे १०० मीटर अंतरावर पडले. स्फोटामुळे रिअ‍ॅक्टर युनिट उद्ध्वस्त झाले आहे. कंपनीच्या एका कर्मचार्‍याने सांगितले की, बहुतेक कामगार मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील आहेत. ६० हून अधिक कामगार आणि ४० इतर लोकांचा कर्मचारी एकाच शिफ्टमध्ये काम करतात. फार्मा कंपनीच्या प्रकल्पामध्ये झालेल्या स्फोट प्रकरणात जिल्हा पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. एसपी परितोष पंकज म्हणाले, आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. 
 

Related Articles