जनसुरक्षा कायदा म्हणजे रौलेट कायद्याचे नवे रुप   

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप; काँग्रेस विरोध करणार

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील भाजप युती सरकार आणू पाहात असलेला जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू आहे. ब्रिटीश सरकारने १९१९ मध्ये देशात रौलेट कायदा आणला होता. कोणालाही, कसलीही चौकशी न करता थेट तुरुंगात डांबण्यासाठी हा काळा कायदा आणला होता. आता देवेंद्र फडणवीस तोच कायदा नव्या रुपात महाराष्ट्रात आणू पाहात आहेत. नागरिकांचा आवाज दडपण्यासाठी हा कायदा आणला जात आहे. जनसुरक्षा कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून सर्वांनी हा कायदा हाणून पाडला पाहिजे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले
 
ते म्हणाले की, शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. मात्र, त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ज्या शहरी नक्षलवादाचा बागुलबुवा ते करत आहेत असा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही, हे त्यांच्याच पक्षाच्या केंद्र सरकारने आरटीआयमधून माहिती मागवली असता स्पष्ट केले आहे. फडणवीस यांच्या डोक्यात जो शहरी नक्षलवाद आहे त्यातून त्यांनी वारकरी संप्रदायालाही शहरी नक्षलवादी ठरवून टाकले आहे. साहित्यिक, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेलाही शहरी नक्षलवाद ठरवले आहे. जी मंडळी संघटना अस्पृश्यतेला विरोध करतात, समतेचा नारा देतात, सामाजिक न्यायाची हाक देतात, स्त्री पुरुष समतेचा हट्ट धरतात अशा पुरोगामी व समाजसुधारकांच्या वर्गाला शहरी नक्षलवादी ठरवले जात आहे. यापुढे जाऊन ते संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यालाही हे शहरी नक्षलवाद ठरवतील. शहरी नक्षलवाद नावाचा गुळगुळीत शब्द वापरून त्यांना पुरोगामी चळवळ मोडीत काढायची आहे. सरकारला वाटले तर ते कोणत्याही संस्थेला, संस्थेच्या देणगीदाराला, संस्थेच्या सदस्यावर विनाचौकशी कारवाई करून तुरुंगात डांबू शकते. जनसुरक्षा कायद्याने दखलपात्र व आजामीनपात्र गुन्हा ठरवला जातो. सरकार विरोधातील कोणताही आवाज दडपण्यासाठीच फडणवीस यांनी हा काळा कायदा आणला असून त्याला सर्वशक्तीनिशी विरोध करावा असे आवाहनही हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

संघ-भाजपला गांधी विचारांची भीती

पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला करण्याच्या घटनेचा निषेध करून सपकाळ म्हणाले की, महात्मा गांधी यांची १९४८ मध्ये हत्या करण्यात आली. पण त्यांना आजही गांधींची भीती वाटते. म्हणूनच गांधी जयंती वा पुण्यतिथीला महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळ्या घातल्या जातात. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्‍याला खासदारकी दिली जाते. पुण्यात जो प्रकार घडला तो संघ व भाजपने आतापर्यंत पेरलेल्या विषवल्लीचे फळ आहे. परभणीत घटनेच्या प्रतिमेची मोडतोड करणार्‍याला जसे मनोरुग्ण ठरवले तसेच पुण्यातील या शुक्ला नावाच्या माथेफिरुलाही मनोरुग्ण ठरवून टाकतील,अशी टीका सपकाळ यांनी केली.
 

Related Articles