मार्गासनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात   

भोर,(प्रतिनिधी) : वेल्हे तालुक्यातील मार्गासनी ते साखर या रस्त्यावील खड्डे बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरुवात केली आहे. शिवसेना (ठाकरे) चे तालुकाध्यक्ष उमेश नलावडे यांनी दोन दिवसांत रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर खड्ड्यात ‘वृक्षलागवड करू, रस्ता बंद करू’ असा इशारा प्रशासनाला दिला होता. 
 
मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार  पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली असून ‘रस्त्यावर खड्डे की रस्त्यात खड्ड’ अशी दुरवस्था झाली आहे. सुमारे १४ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. 
 
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील बारा मावळ व आठरा मावळ खोर्‍यातील नागरिकांना रस्त्यावरून जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याला वाटेत अनेक गावांचे उपरस्ते मिळतात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणांवर विद्यार्थी, चाकरमानी, शेतकरी यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 
या रस्त्याने ऐतिहासिक ‘राजगड व तोरणा’ किल्ल्यापर्यंत जाता येते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे गुरुवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या  दिवशी पर्यटकांची मोठया प्रमाणात वर्दळ सुरू आहे. मात्र रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकांना खड्डे कसे चुकवायचे हाच प्रश्न भेडसावत आहे. अशीच काहीशी स्थिती नसरापूर ते वेल्हा या मुख्य रस्त्याची काही ठिकाणी झाली आहे. 
 

Related Articles