वाचक लिहितात   

सहृदयी प्र-कुलगुरू
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांच्या निधनामुळे शिक्षणतज्ज्ञ, गतिशील प्रशासक, कृतिशील समाज चिंतक, निष्ठावान संघ स्वयंसेवक, प्रभावी वक्ते आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, असे अष्ष्टपैलू व्यक्तीत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करत, संवाद साधत सामोपचाराने तोडगा काढत, विद्यार्थीभिमुख विद्यापीठ होण्यासाठी ते कायमच प्रयत्न करत असताना त्यांच्यातील सहृदयतेचे दर्शन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पीएच.डी. करण्यात डॉ. प्र. ल. गावडे, डॉ. नवलगुंदकर विद्यापीठात अग्रेसर होते. त्यांच्या घरी सर्वांचा मुक्त वावर असे. कित्येक व्याख्यानांसाठी त्यांना दुचाकीवरून घेऊन गेल्याचे स्मरते. त्यांना भावपूर्ण आदरांजली!
 
डॉ. सुनील भंडगे, पुणे.    
 
विक्रमांची रेलचेल!
 
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या दौर्‍यावर गेलेल्या युवा भारतीय संघाने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे खेळवल्या गेलेल्या दुसर्‍या सामन्यात इंग्लंडला पराभूत केले आणि मालिकेत बरोबरी साधली. खरे तर चौथ्या दिवशी तीन गडी बाद ७७ धावा केलेल्या इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांचे आव्हान पेलवणारच नव्हते; परंतु पाचव्या दिवशी सकाळी पडलेला पाऊस इंग्लंडच्या मदतीला येतो की काय आणि भारताच्या विजयावर पाणी पडते की काय? असे चित्र निर्माण झाले होते. भारताच्या सुदैवाने पाऊस थांबला आणि भारताच्या विजयामुळे शेवट गोड झाला! या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले. पहिल्या डावात २६९ धावा फटकावून शुभमन गिल हा इंग्लंडमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला. भारतीय संघाने पहिल्या डावात ५८७ आणि दुसर्‍या डावात ४२७ धावा करून एका सामन्यात १०१४ धावा केल्या. अशा तर्‍हेने कसोटी इतिहासात पहिल्यांदाच भारताने १००० धावांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी २००३ मध्ये सिडनी कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९१६ धावा केल्या होत्या. बर्मिंगहॅममध्ये १९६७ पासून गतकाळात ७ सामने हरणार्‍या आणि फक्त १ सामना अनिर्णित राखणार्‍या भारतीय संघाने हा नववा सामना जिंकून बर्मिंगहॅमला हरण्याची परंपरा मोडीत काढली. या सामन्यात शुभमन गिलच्या अनेक वैयक्तिक विक्रमांसोबत काही सांघिक विक्रमही घडले. एकूणच हा सामना अनेक विक्रमांमुळे संस्मरणीय झाला.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
दिशाभूल करणारे विधान 
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पुण्यातील एका कार्यक्रमात ’जय गुजरात’ असा जयघोष केला. या वादग्रस्त घोषणेनंतर त्यांच्या पक्षाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ‘मुंबई ही गुजरातची राजधानी होती’ असे विधान करून नव्या वादाला तोंड फोडले. हे विधान केवळ ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचेच नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणारे आहे. वास्तविक, १९५६ ते १९६० या दरम्यान ‘मुंबई राज्य’ अस्तित्वात होते. या राज्यात आजचा महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही भाग सामावलेले होते. त्या राज्याची राजधानी मुंबई होती. मात्र, ‘बॉम्बे राज्य’ म्हणजे ‘गुजरात’ नव्हे! १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बलिदानातून महाराष्ट्र व गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये झाली आणि मुंबई ही अधिकृतपणे महाराष्ट्राची राजधानी ठरली. त्यामुळे ‘मुंबई ही गुजरातची राजधानी होती’ हे विधान अर्धसत्य, दिशाभूल करणारे आणि मराठी जनतेच्या इतिहासातील बलिदानावर पाणी फेरणारे आहे.
 
दीपक गुंडये, वरळी.
 
बेरोजगार तरूणांची फसवणूक
 
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे करदात्यांवर अनाठायी बोजा वाढवला. इतर छोटी मोठी पगारवाढ आंदोलने चालूच आहेत. या गोष्टींनी सामान्य नागरिकांना तर फटका बसतोच; पण घरात नोकरीअभावी तरुणांची किती कुचंबणा होत असेल याचा सरकार विचार करेल का? जे नोकरीत आहे त्यांची नीतिमत्ता व मालमत्ता तपासणी गरजेची आहे. बँकेत, सरकारी कार्यालयात केवळ चतुर्थ श्रेणी व सिक्युरिटीकडून कारकुनांनी करणे अपेक्षित असलेली कामे करून घेतली जातात! ही गरजू-बेरोजगार तरुणांची फसवणूक नाही का? संबंधित जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. शहरात, राज्यात, देशात इतकी रोजगार कार्यालये व प्रशासकीय संस्था कार्यरत असताना सरकार बेरोजगारी कमी करून तरुणांची विवंचना कमी करणार का? 
 
नीलम सांगलीकर, पुणे
 
वाटेल तिथे कचरा
 
राज्यातील कोणत्याही शहरात जा, तुम्हाला रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा पडलेला दिसेल! कारण रस्त्यावर कचरा टाकणे ही सवय भारतीयांच्या अंगवळणी पडली आहे. स्वतःचे घर स्वच्छ ठेवायचे, मात्र रस्त्यावर कचरा टाकायचा अशीच काहींची प्रवृत्ती असते. त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणी नेहमी कचरा पडलेला दिसतो. वास्तविक महानगरपालिकेने रस्त्याच्या बाजूला कचरापेटी ठेवलेली असते; मात्र त्या कचरापेटीत कचरा न टाकता रस्त्यावरच कचरा टाकणारे अनेक महाभाग समाजात आहेत. या संकुचित वृत्तीच्या महाभागांमुळेच रस्त्यावर कचर्‍याचा ढीग निर्माण होतो. कोणतीही वस्तू खाल्ल्यावर राहिलेला कचरा कचरापेटीत टाकण्याऐवजी आपण तो रस्त्यावर टाकतो. जोवर हा देश माझा आहे, हा रस्ता माझा आहे, अशी मानसिकता होणार नाही तोवर रस्त्यावर कचरा पडतच राहणार. 
 
श्याम ठाणेदार, दौंड, जि. पुणे

Related Articles