जाईन गे माये तया पंढरपुरा   

आषाढी एकादशी विशेष 

चारुदत्त आफळे,ज्येष्ठ निरुपणकार
 
आषाढी एकादशी ही विठ्ठलभक्तांसाठी पर्वणी. विठ्ठल ‘लोकदेव’ आहे. तो सर्वांना स्वीकारणारा आणि सर्वांनी स्वीकारलेला असा आहे. विठ्ठल घराघरामध्ये पोहोचलेला आहे. याचे कारण संतांनी आईच्या रुपात त्याचे स्वरुप आपल्यासमोर मांडले आहे. देव, वडील वा गुरुंना समजून घेण्यास विद्वत्तेची, योग्यतेची गरज असतेे; मात्र आईजवळ जाण्यासाठी अपार प्रेम एवढीच गोष्ट पुरेशी असते. आज त्याचीच प्रचिती येते.
 
भाविकांसाठी आषाढी एकादशीचा दिवस पर्वणीपेक्षा कमी नाही. वारीची मोठी परंपरा असणार्‍या महाराष्ट्रामध्ये या दिवसाचे मोठे महत्त्व आहे. आपल्याकडे वारीची परंपरा हजार वर्षांपासूनची दिसते. कारण आपले वडीलदेखील वारीला जात होते आणि त्यांनीच आम्हाला वारीच्या सोहळ्यात समाविष्ट करुन विठ्ठलभक्तीच्या परंपरेमध्ये सामावून घेतले, असा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथांच्या अभंगांमध्ये आढळतो. महाराष्ट्राचा प्राप्त असणारा इतिहास ज्ञानेश्वरांपासूनच लक्षात घेतला जात असल्याचे मानले तर लक्षात येते की, वारीची परंपरा खूप जुनी आहे. नामदेवांच्या घरातही वारी आहे. तुकोबांच्या घरी तर आहेच आहे. तेव्हा सगळ्या संतांच्या जीवनात वारीचा उत्सव दिसतो. अर्थात तेव्हाची वारी कशी होती, किती मोठी होती याबाबत फारशी माहिती मिळत नाही; पण अनेक लोक आषाढी-कार्तिकीला पंढरीला जात होते हे नक्की.
 
वारीचे आत्ताचे रुप तुकोबांचे चिरंजीव नारायण महाराजांपासून दिसू लागले असे म्हटले जाते. त्याचे काही ठळक उल्लेख इतिहासात मिळतात. नारायण महाराजांनी तुकोबा आणि ज्ञानेश्वरांच्या पादुका एकत्र घेऊन वारीचा दंडक सुरू ठेवला. वारी एकाच मार्गाने जात असल्यामुळे बरेच लोक सोहळ्याच्या सेवेपासून वंचित राहत होते. ही अडचण लक्षात घेऊन पुढे दोन मार्ग करण्यात आले आणि ज्ञानदेव आणि तुकोबांच्या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरला पोहोचू लागल्या. अधिकाधिक लोकांना सहभागी करुन घेणे, हाच यामागचा हेतू होता. आजही महाराष्ट्रातील ४० ते ५० क्षेत्रांमधील दिंड्या एकत्र येतात आणि परंपरेचे पालन करत सोहळा पार पडतो.
 
विठ्ठल लोकदेव
 
विठ्ठल हा ‘लोकदेव’ आहे. तो सर्वांना स्वीकारणारा आणि सर्वांनी स्वीकारलेला असा आहे. विठ्ठल घराघरामध्ये पोहोचलेला आहे. याचे कारण संतांनी आईच्या रुपात त्याचे स्वरुप आपल्यासमोर मांडले आहे. देव, वडील वा गुरुंना समजून घेण्यास विद्वत्तेची, योग्यतेची गरज असते; मात्र आईजवळ जाण्यासाठी अपार प्रेम एवढीच गोष्ट पुरेशी असते. या नात्याने विठ्ठलाशी बांधले गेल्यामुळे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला. गाणपत्य म्हणजे फक्त गणपतीची उपासना करणारे चिंतामणी देव देखील वारीला येऊ लागले आणि शाक्त म्हणजे फक्त देवीची उपासना करणारेही वारीला आले. अशा प्रकारे दत्तभक्त, महानुभावही यात आले. संतांनी वारीमध्ये आल्यास स्वागतच आहे, हा विचार या सगळ्या पंथापर्यंत पोहोचला आणि त्यांनीही विठ्ठलाच्या वारीला जात असल्याचा अभिमान बाळगला. अशा तर्‍हेने विठ्ठलाची माऊली अर्थात ‘विठाई माऊली’ झाली.
 
पूर्वपीठिका अशीच सांगितली जाते की, पुंडलिक नावाचा ऋषी पंढरपुरामध्ये तपश्चर्या करत होता. त्याला भेटण्यासाठी गोपालकृष्ण तिथे आले. पण आम्ही तुझी तपश्चर्या करायची आणि मग तू इथे येऊन दर्शन द्यायचे असे न करता तू कायमस्वरुपी इथे राहा, म्हणजे आम्हाला तुला केव्हाही भेटता येईल... असा आग्रह पुंडलिकाने धरला आणि देवाने त्याचा स्वीकारही केला. या कथेनुसारही पुंडलिकाने देवाला मित्र, सखा केल्याचे दिसते. भाविकांना तो अगदी जवळच्या वाटण्यामागील हेदेखील एक कारण म्हणता येईल. अन्य देवतांच्या रुपाबद्दल अशा स्वरुपाची भावना जाणवत नाही. त्यांच्याकडे अजूनही गुरुंच्या रुपातच पाहिले जाते. त्याबद्दल एक प्रकारचा धाक जाणवतो; मात्र इथे सगळेजण विठ्ठलाशी येऊन भांडतात, उराउरी भेटतात, त्याला लेकुरवाळा करतात. आईपाशी असतो तोच मोकळेपणा त्यांना त्याच्या ठायी जाणवतो.
 
वारीचे देखणे रुप
 
वारीचे रुपही देखणे आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, खरेतर मुलाला नटण्यात काहीही रस नसतो. पण तरीही आई त्यांना नटवते. कारण तिला आपली मुले तसे बघण्यातच सुख असते. आमची विठाई माऊली तशीच आहे. ती आम्हाला भक्तीप्रेमाने नटवते आणि भेटण्यासाठी, पाहण्यासाठी जवळ बोलावते. वारीच्या सोहळ्याला ज्ञानदेवांनी दिलेले हे रुप किती देखणे आहे पाहा! थोडक्यात, आईचे गोड रुप घेतल्यामुळे हा लोकदेव जनसामान्यांपर्यंत पोहोचलेला दिसतो.
वारीत शिस्त आहे, परंपरेचे पालन आहे, तसेच अत्यंत साधेपणाही आहे. या निमित्ताने समाज एकत्र येतो. एकमेकांमध्ये मिसळून जातो. खरेतर हा एक संस्कार सोहळा आहे. भाविक सर्व असुविधांचा स्वीकार करुन आपल्या भक्तीचे, प्रेमाचे प्रगटीकरण करतात. भगवंताच्या उपासनेत रममाण होतात. वारीतील उपासना खूप कडक असते. नियम काटेकोरपणे पाळले जातात. ठराविक वेळी आरती, कीर्तने  होतात. उपासनेची ही कठोरता पाळताना प्रत्येक वारकरी सुविधेकडे लक्ष न देता ईश्वरावरील भक्तीला प्रथम स्थान देतो. वारीच्या निमित्ताने याचा संस्कार आणि सराव होतो.
 
वारीबद्दल ज्ञानेश्वरांचा एक वेगळा विचारही लक्षात घेण्याजोगा आहे. ‘अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक’ असे ते म्हणतात. इथे आईने म्हणजेच विठ्ठलाने मला सासरी सुखाचा संसार करायला पाठवले आहे, असे ते सांगतात आणि तो किती सुखाचा केला हे सांगण्यास दरवर्षी मी तिच्याकडे जातो, असे ते स्पष्ट करतात.
 
जाईन गे माये तया पंढरपुरा,
भेटेन माहेरा आपुलिया...
 
म्हणजेच वर्षभरात कोणते चांगले काम केले, किती जणांना सन्मार्गी लावले, किती जणांना संस्कारी केले, सजग केले हे सांगण्यास मी पंढरीला जातो. विठ्ठलाला याबाबत सांगणे ही माझी जबाबदारी आहे... असे ते स्पष्ट करतात. ज्ञानदेवांनी वारीला इतके गोड रुप दिले आहे. ईश्वरभक्तांची मांदियाळी करुन दाखवण्याचे विठ्ठलाने दिलेले काम त्यांनी स्वीकारले आणि एकप्रकारे त्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी ते दरवर्षी पंढरीत जातात. वारीचा अशा कितीतरी सुंदर पद्धतीने आणि वेगवेगळ्या आयामांनी विचार केला आहे, हेच अशा उदाहरणांमधून समोर येते. समाजात निकोप वातावरण निर्माण करण्यासाठी अशा विचारांचा फार मोठा उपयोग झाला आणि यापुढेही करुन घेता येईल.
 
जातीपातीचा, कर्मकांडाचा विचार न करता विठ्ठलभक्तीसाठी एकत्र येण्याचा संस्कार वारीने आपल्याला दिला आहे. म्हणूनच ही संस्काराची वारी आहे. इथे प्रत्येकजण एकमेकांना ‘माऊली’ म्हणूनच हाक मारतो. विठाई माऊली आणि ज्ञानेश्वरदेखील माऊलीच...‘क्रोध अभिमान गेला पावटणी,’ असे तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा वाळवंटी मांडलेल्या खेळात आम्ही केवळ मातीच तुडवली नाही तर राग, अभिमान तुडवल्याचे ते स्पष्ट करतात. त्यामुळेच
 
एक एका लागतीय पायीं रे...
 
असे दृश्य दिसते. इथे कोणी कोणाचे शिक्षण, रंगरुप, वय असे काहीही पाहात नाही. सगळे एकमेकांना नमस्कार करतात, पाया पडतात. तुकोबांनी भक्ताची वेशभूषा कशी असते हेदेखील सांगितली आहे.
गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा
हार मिरविती गळा
असे वर्णन ते करतात. वारकर्‍यांची ही एक महत्त्वाची ओळख आहे. गोपी चंदनाची उटी लावलेल्या व्यक्तीवर वाईट आज्ञांचा प्रभाव पडत नाही. पुढे ते
वर्णअभिमान विसरती याती
एकएकां लोटांगणी जाती
 
असे म्हणतात. यावेळी वर्ण हा शब्द कार्यवाचक म्हणून घेतला तर लोक आपला वर्ण विसरले नाहीत पण त्याचा अभिमान विसरले असेच तुकोबा स्पष्ट करतात. म्हणजेच मी हे काम करतो म्हणून तुझ्या वर आहे आणि तू हे काम करतो म्हणून माझ्यापेक्षा खालच्या पायरीवर आहे, हा विचार वा ही भावना विसरणे हे वारीचे संस्कार आहेत, असे म्हणायला हरकत नाही. इथे सगळेच एकसमान असतात.
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें
 
पाषाणा पाझर सुटती रे
 
असे म्हणताना तुकोबांनी वारीमुळे भाविकांची, वारकर्‍यांची चित्ते लोण्यासारखे मऊ व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. असे झाले तर आपण एवढे कठोर का राहिलो, असे वाटून तिथल्या दगडांनाही पाझर फुटल्याखेरीज राहणार नाही, अशी भावना ते व्यक्त करतात. वारी अशीच आहे. वाळवंटात खेळ रंगताना, सावळ्या रुपाचे दर्शन घेताना, कळसाला नमस्कार करुन माघारी फिरताना प्रत्येकाच्या मनात संमिश्र भावनांचा कोळ असतो आणि पुढल्या वर्षी इथेच भेटण्याची आस असते. आजचा दिवसही त्यातील एक...
(शब्दांकन : स्वाती पेशवे)

Related Articles