राजाच्या हत्येनंतर सोनमने राजशी लग्न केले   

सासरच्यांचा आरोप

भोपाळ : सोनमने पती राजा रघुवंशीच्या हत्येनंतर इंदूरला जाऊन तिचा प्रियकर राज कुशवाहशी लग्न केले. त्यामुळेच तिच्याकडे दोन मंगळसूत्रे सापडली, असा आरोप राजा रघुवंशीचा भाऊ विपिन रघुवंशी याने केला आहे. 
 
विपिन रघुवंशी म्हणाला, सोनमच्या सामानाची झडती घेताना दोन मंगळसूत्रे सापडली. यापैकी एक मंगळसूत्र राजाच्या कुटुंबाने लग्नादरम्यान सोनमला दिले होते; परंतु दुसर्‍या मंगळसूत्राबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. राजा रघुवंशीच्या हत्येनंतर इंदूरला जाऊन सोनमने राज कुशवाहशी लग्न केले. हे दुसरे मंगळसूत्र सोनम आणि राजच्या लग्नाचा पुरावा असू शकतो. हे प्रकरण उच्च न्यायालयात आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात नेणार. आम्ही आमच्या भावाला न्याय मिळवून देणार. 
 
सोनमला लग्नादरम्यान राजाच्या कुटुंबाने तब्बल १६ लाख रुपयांचे दागिने भेट दिले होते. मेघालय पोलिसांनी रविवारी मध्य प्रदेशातील रतलाम येथून महत्त्वाचे पुरावे म्हणून काही दागिने, लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केल्यानंतर विपिन रघुवंशी यांनी हा दावा केला.दरम्यान, सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशीच्या भूमिकेवर तो म्हणाला, गोविंदने आधी आमच्या घरी येऊन सांगितले होते की, सोनम ही गुन्हेगार आहे आणि आमचा तिच्याशी कोणताही संबंध नाही; पण आता गोविंद त्याच्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे आश्चर्यकारक आहे.
 

Related Articles