मोदी सरकार फक्त श्रीमंतांचे शेतकरी आत्महत्येवरून राहुल गांधी यांची टीका   

नवी दिल्ली : ’सरकार शेतकर्‍यांचा नाही, तर श्रीमंतांचा विचार करते. पंतप्रधान मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार असे सांगितले होते, परंतु आज शेतकर्‍यांचे आयुष्य अर्धे होत चालले आहे,’ अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर केली.
 
समाज माध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, ’अवघ्या तीन महिन्यांत ७६७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे फक्त आकडे नाहीत, तर ७६७ शेतकर्‍यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. ही अशी कुटुंबे आहेत, जी कधीही सावरू शकणार नाहीत. सरकार या प्रकरणात पूर्णपणे गप्प आहे. ते फक्त उदासीनतेने पाहत आहे.’
 
’शेतकरी दररोज कर्जात बुडत आहेत. बियाणे, खते महाग होत आहेत. डिझेलही महाग झाले आहे. पण एमएसपीची कोणतीही हमी सरकार देत नाही. जेव्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात, तेव्हा त्यांच्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जाते. मोदी सरकार श्रीमंतांचे करोडो रुपयांचे कर्ज सहजपणे माफ करते.’ याचे उदाहरण म्हणजे अनिल अंबानी यांच्या ४८ हजार कोटी रुपयांच्या एसबीआय फसवणुकीचे आहे, असे राहुल यांनी यात नमूद केले.  

सरकार शेतकर्‍यांना मारत आहे

केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत राहुल गांधी यांनी म्हटले की, ’पंतप्रधान मोदी म्हणाले होते, की ते शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करतील. शेतकरी आत्महत्यांच्या घटनांकडे पाहता, असा अंदाज लावता येतो की, उत्पन्न दुप्पट झाले नाही, तर शेतकर्‍यांचे आयुष्य निम्मे होत चालले आहे. ही व्यवस्था शेतकर्‍यांना शांतपणे आणि सतत मारत आहे आणि मोदी फक्त त्यांचा तमाशा पाहत आहेत.
 

Related Articles