बस थांब्यावरील प्रवाशांना टेम्पोने चिरडले   

दोघांचा जागीच मृत्यू; चौघे जखमी

उरुळी कांचन, (वार्ताहर) : भरधाव वेगातील टेम्पोने बस थांब्यावर उभ्या असणार्‍या प्रवाशांना जोरात धडक दिली. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाले आहेत. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गालगत उरुळी कांचन गावाच्या हद्दीतील तळवाडी चौक बस थांब्यावर बुधवारी रात्री अकराच्या सुमारास घडली.  अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला.
 
महबूब रहमान मियाडे (वय ६३, रा. सहजपूर, माकरवस्ती, ता. दौंड), अशोक भीमराव (वय २५, रा. बसनाळ सावली, बिदर) अशी मृतांची नावे आहेत. तर लक्ष्मण बापूराव भारती (वय ६१, रा. आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली), वैशाली भागवत बनसोडे (वय ४०),  भागवत पेरू बनसोडे (वय ४०, दोन्ही रा. सोरतापवाडी, ता. हवेली), मैनुदिन लालमिया तांबोळी (वय ६७, रा. आंबा पिंपळगाव, लातूर) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत जमीर महबूब मियाडे (वय ३३, रा. सहजपूर, माकरवस्ती, ता. दौंड) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हे सर्व प्रवाशी पुणे-सोलापूर महामार्गावर तळवाडी चौकातील बस थांब्यावर बसची वाट पाहत उभे होते. त्यावेळी भरधाव वेगातील टेम्पो मुख्य रस्ता सोडून प्रवाशांच्या दिशेने गेला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर अन्य प्रवाशी जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 

Related Articles