समिती कसली नेमता; सरसकट कर्जमाफी करा   

विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई,  (प्रतिनिधी) : निवडणुकी आधी शेतकर्‍यांना आश्वासने द्यायची आणि सत्ता आल्यावर शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडायचे, ही शेतकर्‍यांची फसवणूक आहे. सरकारने शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
 
बळीराजाच्या विविध प्रश्नावर २९३ च्या प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना निवडणुकीआधी कोरडवाहू पिकांसाठी १३,५००, बागायतीसाठी २७,००० तर फळबागांसाठी ३६,००० रुपये इतकी मदत आणि ३ हेक्टरपर्यंतची मर्यादा निश्चित होती. पण, आता सत्ता आल्यावर मात्र निवडणुकीनंतर कोरडवाहूसाठी ८,५००, बागायतीसाठी १७,००० आणि फळबागांसाठी २२,००० इतकी घटवण्यात आली. इतकेच, नाहीतर ३ हेक्टची मर्यादा २ हेक्टर करण्यात आली. निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे महायुतीने आश्वासन दिले होते. आता मात्र कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची भाषा वापरली जात आहे. शेतकर्‍यांना समिती नको तर कर्जमाफी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. शेतकर्‍यांच्या शेतमालाला दीडपट भाव देऊ, असे सांगणारे आता सोयाबीन आणि धानाला हमीभाव ही मिळत नाही. राज्याचे कृषिमंत्री हे पदावर बसून सतत शेतकर्‍यांचा अपमान करणारी विधान करत आहे. कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे, असे कृषिमंत्र्यांना वाटते यावरून ते किती असंवेदनशील आहेत हे स्पष्ट होते. शेतकर्‍यांचा वारंवार अपमान करणार्‍या या कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा त्यांना हवे ते मलईदार खाते द्यावे. पण, शेतकर्‍यांच्या अपमान करणारे कृषिमंत्री नको, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.सत्ताधारी मंत्री, आमदार सगळेच बळीराजाचा अपमान करत आहे.
 

Related Articles