वाचक लिहितात   

मोबाईलद्वारे मतदानाचा प्रयोग
 
लोकशाहीमध्ये मतदानाला खूप महत्त्व असून ते एक पवित्र कर्तव्य मानले जाते. पण अनेकवेळा मतदारांना विशेषतः वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, तेथील स्थलांतरित मतदार अशा व्यक्तींना इच्छा असूनही प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावत येत नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरते. त्यावर उपाय म्हणून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू न शकणार्‍या मतदारांसाठी देशात प्रथमच ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. हा मान बिहार राज्याने मिळवला असून बिहार हे भारतातील मोबाईल अ‍ॅपद्वारे ई-मतदान सुविधा देणारे पहिले राज्य बनले आहे. बिहारच्या पाटणा, नालंदा, बक्सर, रोहतास, पूर्व चंपारण या जिल्ह्यांमधील नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल द्वारे ई-व्होटिंग पद्धतीने मतदान करण्यात आलेे. यामध्ये मोबाईल अ‍ॅपद्वारे मतदान केलेल्या दुबई, कतारसारख्या देशांमध्ये राहणार्‍या स्थलांतरित बिहारी नागरिकांचा समावेश आहे. ही नवीन ई-वोटिंग प्रणाली ब्लॉकचेन तंत्रज्ञान, चेहरा ओळख प्रणाली आणि डिजिटल सुरक्षा यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांवर आधारित असल्यामुळे मतदान प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक मानली जाते. त्यामुळे देशात येणार्‍या काळातील निवडणुकांमध्ये ई-व्होटिंग मतदानाचा वापर होण्याची शक्यता आहे.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
नैतिक मूल्यांचा र्‍हास
 
कौटुंबिक व सामाजिक संबंध यांची  जपवणूक करणे ही आजच्या काळातील खरी कसोटी होय. कौटुंबिक व सामाजिक संबंधावरच जीवन जगणे खरे जीवन जगणे होय. कौटुंबिक व सामाजिक संबंध जिव्हाळ्याचे, आत्मीयतेचे, सद्भावनेचे,   सतसंगाचे, निकोप, शुद्ध मनाचे, निर्मळ मनाचे, स्नेह, आपुलकी, सहकार्य व सकारात्मक असावे. यातूनच जीवन जगण्याचा आनंद उपभोगता येतो. मात्र आज हे दोन्ही संबंध क्षुल्लक कारणावरून, क्षुल्लक बाबींवरून दुराव्याची मोठी दरी निर्माण करीत आहेत. क्षुल्लक कारणावरून मनं दुखावली जातात, क्षुल्लक बाबींवरून विरोधाभास निर्माण होतो. आजकाल तर मान, सन्मान, आदराची पदोपदी पायमल्ली होत आहे. नीतिमूल्ये, नैतिकता, जीवनमूल्ये, मानवी मूल्ये, ही कुठेच पाळली जात नाहीत.
 
धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर
 
प्रामाणिक वीजग्राहकावर भार
 
राज्यातील ग्राहकांकडे 1 लाख  कोटींची थकबाकी वीज बील वसुलीकडे महावितरणचे सपशेल दुर्लक्ष मोफत घोषणांमुळे कृषी पंपाचे 756 हजार कोटी थकले हे वृत्त वाचनात आले. या थकबाकी वसुलीसाठी महामंडळाचा सोपा मार्ग म्हणजे वीज दरात आणि सुरक्षा ठेव रकमेत वाढ करणे. यामुळे वेळेत बिल भरणारे ग्राहक भरडले जात आहेत. वेळेत बिल भरणार्‍यांना पाच दहा रुपयांची सूट दिली जाते. याउलट थकबाकीदारांना व्याज माफी, हप्त्याने बिल भरण्याची सवलत दिली जाते. बिल भरण्याच्या अखेरच्या तारखेस पैसे भरले नाहीत तर दुसर्‍या दिवशी त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, अशी स्पष्ट सूचना वीज बिलावरच छापावी. याबाबत दुजाभाव करू नये. असे करताना ग्राहक कोण आहे हे पाहू नये. तसे कटाक्षाने केल्यास वेळेत बील न भरण्याच्या प्रवृत्तीस आळा बसेल. महामंडळाने याचा गंभीरपणे विचार करून त्याची अंमल बजावणी करावी.
 
विजय देवधर, पुणे
 
संस्कारक्षम मालिका हव्यात
 
सध्याच्या सेट टॉप बॉक्स व केबलच्या युगात प्रेक्षकांना शेकडो वाहिन्या पाहायला मिळतात. या वाहिन्यांवर दररोज मालिका दाखवल्या जातात. मात्र या मालिकांपैकी एकही मालिका संस्कारक्षम नसते. जवळपास सर्वच वाहिन्यांवरील मालिका स्त्री जीवनाशी निगडित, गुन्हेगारी क्षेत्रावर आधारित किंवा अंधश्रद्धा पसरवणार्‍या असतात. या मालिकांमधून स्त्रियांवरील अन्याय, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, व्यसन, कुटुंबातील व्यक्तींचा एकमेकांवरील द्वेष, त्यातून रचले जाणारे कट कारस्थाने, कौटुंबिक भांडणे अशा प्रकारची दृश्ये दाखवली जातात त्यामुळे कुटुंबातील सदस्यांवर, कुटुंबातील लहान मुलांवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. काही काही मालिका अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करतात. सरकारने अशा अंधश्रद्धा पसरवणार्‍या मालिकांवर बंदीच घालायला हवी.
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
 
वारीमुळे एकात्मतेत वाढ
 
पंढरपूर वारी ही केवळ भक्तीची यात्रा नसून, ती एक सामाजिक आणि आध्यात्मिक चळवळ आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या सोबत लाखो वारकरी हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करताना सामूहिक भक्ती, अभंगगायन, कीर्तन आणि साधना करतात. या यात्रेमुळे व्यक्तीच्या मनात भक्तिभाव जागृत होतो, नम्रता आणि सहनशीलता वाढते. वारी ही संपूर्ण समाजाला एकत्र आणणारी परंपरा असून, ती जात, धर्म, वय यांच्यापलीकडे जाऊन एकात्मता आणि समरसतेचा संदेश देते. वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी पर्यावरणविषयक जनजागृती, स्वच्छतेचे महत्त्व आणि सेवा कार्ये केली जातात. वारीमुळे समाजात सेवाभाव, संयम आणि शिस्तीचे मूल्य रुजते, जे वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते.     
 
आल्हाद माळगावकर, पनवेल

Related Articles