पटोलेंवर कारवाई; विरोधकांचा बहिष्कार   

मुंबई, (प्रतिनिधी) : भाजप आमदार, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकर्‍यांबद्दल केलेल्या अवमानकारक विधानाचा निषेध करीत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी मंगळवारी विधानसभेत केली. त्याचवेळी पटोले अध्यक्षांच्या आसनापर्यंत गेल्याने व विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने विधानसभेत गदारोळ झाला. 
 
या दरम्यान, पटोले यांनी पंतप्रधानांसंदर्भात विधान केल्याने गोंधळात भर पडली. अध्यक्षांनी काही वेळासाठी कामकाज तहकूब केल्यानंतरही पटोले यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांना दिवसभराकरिता निलंबित केले. यामुळे संतप्त महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजावर दिवसभराकरिता बहिष्कार घातला.
 
पटोले यांनी माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांनी शेतकर्‍यांच्या विरोधात केलेल्या अवमानास्पद वक्तव्यांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. लोणीकर यांनी शेतकर्‍यांचा बाप काढला. सत्ताधारी मंत्री, आमदार सातत्याने शेतकर्‍यांचा अपमान करत आहेत. हा अपमान आता राज्यातील शेतकरी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांची माफी मागितली पाहिजे. शेतकर्‍यांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली. 
 
विरोधी पक्षाच्या सर्वच सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.  पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला धाव घेतली. पटोले यांनी पंतप्रधानांचा उल्लेख केल्याने सत्ताधारी सदस्यही आक्रमक झाले.
 
नार्वेकर यांनी पटोले यांच्या वक्तव्यावर नापसंती व्यक्त करताना, अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीकडून असंसदीय भाषेचा उपयोग होणे, मला बरोबर वाटत नाही, हे चुकीचे असल्याची समज दिली. पटोले यांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ जात संताप व्यक्त केला. यामुळे नार्वेकर यांनी सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब केली. तेव्हाही पटोले आक्रमक होते. 
 
दरम्यान, पटोले हे सभागृहाचे अध्यक्ष राहिले आहेत. राज दंडाला हात लावल्यानंतर काय कारवाई केली जाते, याची कल्पना तुम्हाला असेल. मला कारवाई करायला भाग पाडू नका, असा इशारा देऊन नार्वेकर यांनी पटोले यांना जागेवर जाण्यास सांगितले.
 
निलंबनाच्या कारवाईनंतरही पटोले यांनी मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पटोले म्हणाले, लोणीकर यांनी शेतकर्‍यांबद्दल केलेले विधान आक्षेपार्ह आहे. शेतकर्‍यांसाठी मी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच काय आमदारकी व अख्खं आयुष्य शेतकर्‍यांसाठी देईन. 
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करताना, अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे योग्य नाही, पटोले यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली. यानंतर पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा अध्यक्ष नार्वेकर यांनी केली. तसेच, त्यांना सभागृहाच्या बाहेर जाण्यास सांगितले. यानंतर पटोले सभागृहाच्या बाहेर निघून गेले. तर, कारवाईचा निषेध करत विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी सभात्याग करून कामकाजावर बहिष्कार घातला.
 

Related Articles